कडवई वाणीवाडी बाजारपेठ स्मशानभूमीची बिकट वाट; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.

महाराष्ट्र

कडवई: संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ येथील स्मशानभूमी कडे जाण्यासाठी मार्गच नसल्याने येथील ग्रामस्थांना अंत्यविधी करताना अक्षरशः मृत्यूशी सामना करावा लागत आहे . गेली सत्तर वर्षे ही पारंपारिक स्मशानभूमी विकासापासून वंचित राहिली असल्याने येथील ग्रामस्थ आत्ता रस्त्यावर उतरण्याचा तयारीत असल्याचे समजते.

कडवई वाणीवाडी ,बाजारपेठ तसेच समर्थनगर या भागातील लोकांना अंत्यविधीसाठी कडवई तुरळ मार्गाच्या लगत नदीच्यापलीकडे एक स्मशानभूमी आहे . गेली सत्तर वर्षांपासून येथील ग्रामस्थ या पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत .मात्र या स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने फार मोठी अडचण होत आहे .पावसाळ्यामध्ये तर मोठ्यापाण्यातून कसरत करत शव न्यावे लागत आहे . अनेकवेळा मुसळधार पाऊस असताना येथील तरुण मानवीसाखळी करून शव नेत असताना काही लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून येथील तरुणांच्या प्रसंगावधनाने अनर्थ टळत आहे.

यापूर्वी या स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित होता . आता हा वाद येथील ग्रामस्थांनी सामोपचाराने सोडवला आहे . मात्र येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे .स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता व पूल व्हावा यासाठी येथील ग्रामस्थ अनेकवर्षे प्रशासनाशी पत्रव्यवहार करत आहेत . मात्र यापूर्वी हा वाद न्यायालयात असल्याचे कारण सांगून या प्रस्तावाना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात होत्या . मात्र आत्ता हा वाद सम्पला असून प्रशासनाने या बाबीकडे विशेष लक्ष घालून स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता व पूल बांधण्यासाठी तरतूद करून ग्रामस्थांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा नाईलाजाने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या मनस्थितीत येथील ग्रामस्थ असल्याचे दिसून येते.