निवडणूक आयोगाला पत्र; प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने जिल्हयात मोठी खळबळ!
शिरूर (अरुणकुमार मोटे): पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याने पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. खेड-आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदार यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. जोगेंद्र कट्यारे हे सध्या खेड-राजगुरूनगर प्रांताधिकारी आणिसहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, PMRDA चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंधाचा आधार घेतला असल्याचा आरोप जोगेंद्र कट्यारे यांनी केला आहे. कट्यारे यांनी आमदारांचे थेट नाव घेतलेले नाही. मात्र, खेड- आळंदीला आमदार अजित पवार गटाचे दिलीप मोहिते आहेत. त्यांच्या प्रभावातून सुहास दिवसे काम करत आहेत. तसेच सुहास दिवसे हे जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहेत. आमदार त्यांचे हितसंबध जोपसण्यासाठी दिवसे यांचा वापर करत आहे, असे कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.
सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना २८ मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला. सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणी आधी त्यांची बदली करावी, अशी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. कट्यारे यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी