श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिलासा

महाराष्ट्र

१६ जानेवारीपासून सर्व प्रकारच्या उसाला प्रतिटन १०० रुपये अनुदान

बारामती: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दिनांक १६ जानेवारीपासून कारखान्यात गाळपासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या उसाला (आडसाली, सुरू, पूर्वहंगामी व खोडवा) प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

या निर्णयाची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली. कार्यक्षेत्रातील आडसाली उसाचे वाढलेले क्षेत्र आणि ऊस तोडीस होणारा विलंब लक्षात घेऊन सभासदांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे १६ जानेवारीपासून गाळपास येणाऱ्या उसाला सभासदांना एकूण ३२०१ रुपये प्रतिटन दर मिळणार आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ यांच्यासह कार्यकारी संचालक अशोक जाधव आणि जनरल मॅनेजर हनुमंत करवर उपस्थित होते.

दरम्यान, जळीत ऊस मोठ्या प्रमाणात येत असल्याने साखर उताऱ्यावर परिणाम होत असल्याचे सांगत, १६ जानेवारीपासून जळीत उसास प्रतिटन २०० रुपये नुकसान भरपाई कपात करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे.

कारखान्याचे ऊस गाळप व साखर उतारा वाढल्याशिवाय आर्थिक स्थिती सुधारणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत, “माझा कारखाना, माझी जबाबदारी” ही भावना ठेवून सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कारखाना प्रशासनाने केले आहे.