रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विविध साहित्य संस्था, परिवहन विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते.

राज्यात मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत कार्यरत राहतील.

चालकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार असून, सुमारे चार हजार शिक्षक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. प्रत्येक महिन्यातील चार शनिवार-रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. काही शिक्षक विनामूल्य सेवा देणार असून काहींना प्रति तास एक हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी आवश्यक निधीसाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पुढाकार दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाणार असून, त्यांच्या मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमतेची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.याशिवाय रिक्षा-टॅक्सी तसेच ओला, उबेर आणि रॅपिडो वाहनांवर मराठी जनजागृतीसाठी स्टिकर्स लावले जाणार असून, विशेष बॅनर्सद्वारे प्रचार मोहीमही राबविण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत