शेतकऱ्यांनो! आता तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही

महाराष्ट्र

नवा निर्णयामुळे २० ते २५ दिवसांत सातबाऱ्यावर होणार दस्त नोंद

संभाजीनगर: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही. राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे, जमीन खरेदी केल्यानंतर अवघ्या २० ते २५ दिवसांत तुमच्या सात-बारा उताऱ्यावर दस्त नोंदणी होणार आहे.

डिजिटल क्रांतीमुळे प्रक्रिया झाली सोपी आणि वेगवान

यासाठी आय सरिता आणि ‘ई-फेरफार’ या दोन संगणकीय प्रणालींना एकमेकांशी जोडण्यात आले आहे. यामुळे जमीन व्यवहाराची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक झाली आहे, ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. यापुढे तलाठी कार्यालयातील हेलपाट्यांना पूर्णविराम मिळणार आहे.

कसा होणार दस्त नोंदणीचा प्रवास

आतापर्यंत सात-बारा उताऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी २-३ महिने किंवा कधीकधी वर्षभरही लागत असे. पण आता ही प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे:

दस्त नोंदणी होताच, सर्व माहिती डिजिटल पद्धतीने थेट महसूल विभागाच्या ‘ई-फेरफार’ प्रणालीकडे जाईल. यात जमीन विक्रेता, खरेदीदार, क्षेत्रफळ, व्यवहाराची तारीख आणि बाजारमूल्य यांसारखी सर्व माहिती स्पष्टपणे उपलब्ध असेल. त्यानंतर तलाठी संबंधित पक्षकारांना नोटीस पाठवतील. मंडल अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर, तुमच्या सात-बारा उताऱ्यावर नावाची नोंद तातडीने केली जाईल.

शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी फायदा या योजनेत फक्त ग्रामीण भागातील सात-बारा उताऱ्यांसाठीच नाही, तर शहरी भागातील मिळकत पत्रिकांसाठीही सुधारणा करण्यात आली आहे. शहरी मिळकत पत्रिकांवरील फेरफार नोंदीसाठी ‘ई-पीसीआयस्त्री’ ही तिसरी संगणकीय प्रणाली जोडण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील जमीन आणि मिळकत व्यवहारांच्या नोंदी डिजिटल पद्धतीने एकत्रित झाल्या आहेत.

भ्रष्टाचार थांबणार, विश्वास वाढणार

महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने एकत्र येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. यामुळे जमीन व्यवहारातील अनावश्यक अडथळे, विलंब आणि भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. सरकारचा हा निर्णय केवळ वेळेची बचत करत नाही, तर पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवून सामान्य माणसाचा प्रशासनावरील विश्वास वाढवेल अशी अपेक्षा आहे.