राज्यातील १९ महाविद्यालयांत १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; चंद्रकांत पाटील यांचे कामांना गतीचे निर्देश

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या कामांना गती देण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

महाप्रीत (MAHAPREIT) आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार राबविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आराखडा सादर करण्यात आला. निर्धारित कालावधीत गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले.

या प्रकल्पांतर्गत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (DTE) संस्थांमध्ये ४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जाकरण करण्यात येणार असून, त्यामध्ये ५० टक्के बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली (BESS) असणार आहे. १५ मेगावॅट नेट मीटरिंग, ५ मेगावॅट बिहाइंड-द-मीटर आणि २५ मेगावॅट ओपन ॲक्सेस या माध्यमांतून सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे संस्थांचा वीज खर्च कमी होण्यासह पारंपरिक वीजेवरील अवलंबित्वही घटणार आहे.

प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता तपासणी, विकासकाची निवड, आर्थिक पूर्तता, प्रकल्प उभारणी, कार्यान्वयन तसेच दीर्घकालीन देखभाल अशा सर्व टप्प्यांचा १८ महिन्यांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

बैठकीत आतापर्यंतच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड येथील १९ ठिकाणी नमुना सर्वेक्षण पूर्ण झाले असून, PMU नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच ऑन-ग्रिड सौरऊर्जा प्रकल्पासाठी विकासक निवडीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच महाप्रीतचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत