मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकीकडे सत्तास्थैर्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होत असतानाच, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विलीनीकरणास अनुकूल नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले असताना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते मात्र अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशीच इच्छा होती, असा ठाम दावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात नेमके काय घडणार, याबाबत सामान्य जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
तटकरे नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे संकेत दिले.
“आम्ही सर्वांनी मिळून अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विलीनीकरणाच्या विषयावर आम्ही सखोल चर्चा करू,” असे ते म्हणाले.
तटकरे पुढे म्हणाले की, येत्या 10 फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित असतील. त्या वेळी त्यांच्याशी विलीनीकरणाबाबत निश्चित चर्चा केली जाईल.
याशिवाय सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावरही जाऊ शकतात. त्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचीही शक्यता असून, योग्य वेळी बसून विलीनीकरणावर चर्चा केली जाईल, असे संकेत तटकरे यांनी दिले.
विमान अपघाताबाबत तटकरेंची स्पष्ट भूमिका
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित केल्या जात असलेल्या शंकांवर बोलताना सुनील तटकरे यांनी सखोल चौकशीची मागणी केली.
“मी सुरुवातीपासूनच या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला असून, अजितदादांचं जाणं अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे या अपघातामागील सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अपघाताबाबत शंका उपस्थित करणाऱ्या व्यक्तींशी तपास यंत्रणांनी संपर्क साधावा, अशी मागणी करत तटकरे म्हणाले की, या शंका व्यक्त करणारे काही नेते मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्याकडील माहिती जाणून घ्यावी. राज्यातील जनतेला या दुर्दैवी घटनेमागील सत्य लवकर समजलेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तटकरे यांच्या या विधानामुळे आता येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात नेमकी कोणती दिशा घेतली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.