मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्या म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी लोकभवन येथे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी मोठं विधान केलं आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असल्याचा आनंद व्यक्त करत ते म्हणाले, “सुनेत्रा पवार सक्षम आहेत. त्या प्रशासन उत्तम प्रकारे सांभाळतील. त्यांचं उपमुख्यमंत्री होणं ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे.”
यावेळी अतुल बेनके यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतही भूमिका स्पष्ट केली. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात ही अजित पवार यांची इच्छा होती. यासंदर्भात अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि माझ्यासोबत चर्चाही झाली होती. सध्या राजकीय परिस्थिती काहीही असली तरी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच एकत्र येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाचे म्हणजे, अतुल बेनके यांनी यापूर्वीही विधानसभा निवडणुकीच्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी भूमिका उघडपणे मांडली होती. त्यांच्या बॅनरवर अनेकदा शरद पवार यांचे फोटो झळकले होते. यामुळे राजकीय वादही निर्माण झाले होते. मात्र टीका-टीप्पणींकडे दुर्लक्ष करत अतुल बेनके आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.
अतुल बेनके यांचे वडील वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे बेनके कुटुंबीयांचे पवार कुटुंबाशी घनिष्ठ संबंध राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर अतुल बेनके यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रिकरणाच्या चर्चांना वेग आला आहे.