मालेगाव वादावरून राज्यात तणाव! देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा; अधिकृत भूमिका माझीच

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांनी लावलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटोवरून सुरू झालेला वाद आता अधिकच पेटला आहे. महापालिकेतील दालनात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जाऊन हनुमान चालिसा पठण केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी मदरशांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. “राज्यातील काही मदरशांत दहशतवादी तयार होतात, सर्व मदरसे बंद करू,” अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. तसेच मालेगाव प्रकरणावर भाष्य करताना “नमाज पठणासाठी मशिदी कमी पडतात का?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजासह विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत प्रतिक्रिया देताना, “आता बस्स झालं हिंदू-मुस्लिम; राज्यात इतरही गंभीर प्रश्न आहेत,” असे म्हटले होते.

दरम्यान, “नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांना मुख्यमंत्री अभय देतात का?” असा सवाल उपस्थित होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भूमिका स्पष्ट केली. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, “मी पक्षाचा सर्वोच्च नेता असून माझी जी भूमिका आहे, तीच भाजपची अधिकृत भूमिका असते. इतर कोणी काही बोलले, तर ते त्यांचे वैयक्तिक मत असते.”

नितेश राणे यांच्या वक्तव्यांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “कधी कधी ते बोलताना काही गोष्टी जास्त बोलून जातात. अशा वेळी त्यांना सांगितले जाते की, अशी विधानं टाळावीत.” मात्र मदरशांबाबत केलेल्या विधानांचा संदर्भ त्या काळातील परिस्थितीशी जोडला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. काही ठिकाणी बाहेरून निधी येत असल्याची माहिती आणि काही शिकवणुकींवर आक्षेप असल्याच्या पार्श्वभूमीवर ते वक्तव्य झाले असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.मालेगावमधील घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.