कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे

महाराष्ट्र

मुंबई: कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे. आपल्या श्रद्धेला कुणी डिवचलं तरी देखील कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमातून केलं आहे.

कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी देशासह जगभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. सध्या जगभरात कट्टरता असहिष्णुता आणि अस्थिरता वाढत आहे. धर्म सर्वत्र पोहोचला पाहिजे. मात्र त्याचा अर्थ धर्मांतर करणे नव्हे, धर्म म्हणजे एक जीवनस्वभाव आहे.

संघा इतका इतर कोणत्याही संघटनेला तीव्र विरोध सहन करावा लागला नसेल. मात्र शुद्ध प्रेम हाच संघाचा आधार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर सामाजिक समरसतेवर बोलताना ते म्हणाले, “मंदिर, पाणी आणि स्मशान हे सर्वासाठी खुलं असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव असायला नको.”

दरम्यान, याच कार्यक्रमातून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका असंही आवाहन केलं. ते म्हणाले, “काहीही झालं तरी संविधान आणि कायद्याचे पालन केलं पाहिजे. आपल्या श्रद्धेला कुणी डिवचलं तरी देखील कायदा हातात घेऊ नका, पोलिसांकडे जा गरज असल्यास शांततेत आंदोलन करा, मात्र, टायर जाळणे किंवा दगडफेक अशा गोष्टी करू नका.

देशातील जनतेने आत्मनिर्भरतेवर भर देण्याचं आवाहन करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारावर भाष्य करताना ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय व्यापार स्वेच्छेने व्हायला हवा, दबावाखाली नव्हे. शिवाय जे आपल्या देशात तयार होते ते बाहेरून आणण्याची गरज नाही. जे इथे तयार होत नाही तेच परदेशातून घ्यायला हवं, असं आवाहन देखील भागवत यांनी केलं.