महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जाहीर सभा
उल्हासनगर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाच्यावतीने उल्हासनगर येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी व सिंधी समाजाच्या एकतेवर भर देत उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “उल्हासनगरमध्ये मराठी आणि सिंधी बांधव एकदिलाने काम करत आहेत. दुधात साखर विरघळावी तसे हे नाते आहे. या विश्वास आणि विकासाच्या युतीमुळेच शिवसेना, ओमी कलानी टीम, साई पार्टी आणि इतर घटक एकत्र आले आहेत.” त्यामुळे महापालिकाही आपल्या सोबत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री असताना उल्हासनगरच्या विकासासाठी सुमारे १४०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लागले. सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालय, परिवहन सेवा, अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा योजना, रस्ते, गार्डन, खेळाची मैदाने यांसारखी कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, उल्हासनगरमधील सर्व धोकादायक इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे पुनर्विकास केला जाईल आणि नागरिकांना सुरक्षित, सुविधा-संपन्न घरे दिली जातील. “सत्ता किंवा खुर्चीसाठी नाही, तर विकासासाठी शिवसेना काम करते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘लाडकी बहिण’ योजनेचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. महिलांना आत्मनिर्भर बनवणे हाच या योजनेचा उद्देश आहे. “मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे, गरिबी पाहिली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या वेदना मला समजतात,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
महापालिका निवडणुकीत शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचा भगवा झेंडा उल्हासनगर महापालिकेवर नक्कीच फडकणार, असा विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी मतदारांना १५ तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार पप्पू कलानी, साई पक्षप्रमुख जीवन ईदनानी, टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी तसेच पीपल्स रिपब्लिक पक्षाचे प्रमुख जयदीप कवाडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार आणि नागरिक उपस्थित होते. उल्हासनगरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, ही माझी हमी आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सांगता केली.