मुंबई: बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे असलेली बहुतांश खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली, तरी वित्त आणि नियोजन विभागाचे महत्त्वाचे खाते अद्याप देण्यात आलेले नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे. पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
ही माहिती भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा केला आहे. गोयल यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पीयूष गोयल काय म्हणाले?
पीयूष गोयल म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आधी अजित पवारांकडे होते आणि आता सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांना राष्ट्रवादीत सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल, असे मला वाटत नाही, कारण त्यांनी जनतेचा विश्वास आणि मते गमावली आहेत.”
गोयल यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून, पक्षाकडून यावर अधिकृत भूमिका काय घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.