‘सिद्धिविनायक चोरीप्रकरणी मला माहिती नाही’; बांकीपूर पराभवानंतर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्र

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. या निकालामुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढेल, असा दावा त्यांनी केला. मात्र, सिद्धिविनायक मंदिरातील कथित चोरीप्रकरणी प्रश्न विचारला असता, त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

राऊत म्हणाले, “देशात सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. बांकीपूरचा निकाल हे त्याचं उदाहरण आहे. 1995 पासून जिंकत आलेली जागा भाजपला राखता आली नाही. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी याच मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता, मात्र आता ती जागा भाजप गमावली.”

यावेळी त्यांनी जंतर-मंतरवरील जेन झी आंदोलन, राम मंदिरातील कथित चोरी आणि धार्मिक मुद्द्यांचाही उल्लेख करत भाजपवर टीका केली. “या सर्व घटनांचा मतदारांवर परिणाम झाला आहे. बिहारच्या जनतेच्या डीएनएमध्ये राजकारण आहे,” असे ते म्हणाले.

सिद्धिविनायक मंदिरातील चोरीवर काय म्हणाले?

राम मंदिराप्रमाणेच सिद्धिविनायक मंदिरातील कथित चोरीप्रकरणीही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी या प्रकरणात विशाखा राऊत यांच्या नियुक्त कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला होता. यावर राऊत म्हणाले, “या प्रकरणाची मला माहिती नाही. हा तांत्रिक विषय आहे. मी त्याच्या खोलात गेलेलो नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही.”

‘पोटनिवडणुकीचे निकाल महत्त्वाचे’

राऊत यांनी पोटनिवडणुकींचे राजकीय महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, अशा निकालांमुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांनी अलाहाबाद पोटनिवडणुकीचा दाखला देत, “त्या विजयापासून काँग्रेसच्या पतनाची सुरुवात झाली होती. पोटनिवडणुकीचे निकाल पुढील राजकारणाची दिशा ठरवू शकतात,” असे मत व्यक्त केले.

मोहन भागवतांनी आंदोलनातील तरुणांशी संवाद साधावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जेन झी पिढीशी संवाद साधणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “भाजप किंवा संघाच्या नेत्यांच्या मुलांशी नव्हे, तर जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या आणि पोलिस कारवाईला सामोरे गेलेल्या तरुणांशी संवाद साधावा. त्यांच्या भावना समजून घेतल्याशिवाय वास्तव कळणार नाही.”

राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे पोटनिवडणुकीचे निकाल, जेन झी आंदोलन आणि मंदिरांतील कथित चोरीचे मुद्दे पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत