शेतकऱ्याच्या प्रसंगावधनामुळे फसला तरुणीवरील बलात्काराचा प्रसंग

महाराष्ट्र

पोलिसांच्या सतर्कतेने पिडीत तरुणी नातेवाईकांच्या स्वाधीन

पुणे: उरुळीकांचन येथील शेतकऱ्याने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे नराधमाच्या तावडीत सापडलेल्या एका परप्रांतीय तरुणीची सुटका झाली आहे. तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न फसला असून ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) रेल्वे स्थानक परिसरातील तांबे वस्ती परिसरात सोमवारी (दि. 4) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धनंजय मारुती तांबे (रा. तांबेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे शेतकऱ्याचे नाव असून तांबे यांच्या धाडसाचे परिसरात कौतुक केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय तांबे यांची उरुळी कांचन रेल्वे स्थानकाजवळ शेती आहे. या शेतीत ऊसाचे पिक आहे. सोमवारी सकाळी ऊसाच्या पिकाला तांबे हे पाणी देत होते. अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तांबे यांना 100 ते 150 फुटावर एक तरुणी ऊसाच्या शेतात ओरडत असल्याचा आवाज आला. तसेच एक मुलगी ऊसाच्या शेतातून बाहेर पळत आल्याची दिसून आली.

यावेळी मुलगी खूप घाबरलेली दिसून आली होती. तसेच तिचे कपडे विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आले. यावेळी तांबे यांनी सदर तरुणीची चौकशी करण्यास सुरुवात केली असता एक तरुण ऊसाच्या बाहेर आला. तांबे यांना पाहताच त्या तरुणाने त्या ठिकाणावरून धूम ठोकली. सदर मुलीला पाणी पिण्यास देऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.

याबाबत तिला माहिती विचारली असता तिने सांगितले की, सदर तरुणी ही बिहारची असून ती नातेवाईकांबरोबर आली होती. तरुणीला पुण्याला यायचे असल्याने ती कल्याण स्थानकावर उतरून रेल्वेने पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेत बसली होती. रेल्वेत तिची काही बिहारी नागरिकांशी ओळख झाली होती. या ओळखीतून एका तरुणाने तिला पुण्यात सोडतो असे सांगितले होते. तिला पुणे माहिती नसल्याने तिला उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर घेऊन आला.

दरम्यान, रेल्वे स्थानकावर उतरून ऊसाच्या पलीकडील बाजूला टेम्पो मिळतात व त्या टेम्पोमधून आपण पुण्याला जाऊ असे सांगून तिला उसाच्या शेतात घेऊन गेला. यावेळी सदर तरुणाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धनंजय तांबे यांच्या प्रसंगावधनामुळे तरुणीवरील प्रसंग टळला गेला. धनंजय तांबे यांनी सदर तरुणीला समजावून सांगून उरुळी कांचन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून सदर तरुणीला त्यांच्या स्वाधीन केले. तरुणी अथवा तीच्या नातेवाईकांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.