महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका
मुंबई: पाहलगाम हल्ल्याला एक वर्ष उलटूनही हल्लेखोरांना शिक्षा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले.
तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारत, “पाहलगाम हल्ल्याचा सूत्रधार साजिद जाट याला फाशी कधी देणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. हल्ल्यातील पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
परराष्ट्र धोरणावर टीका करताना त्यांनी विचारले की, पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या ४० मिनिटांच्या दूरध्वनी संभाषणाचा उपयोग पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी का करण्यात आला नाही. जाटचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी अशा चर्चांचा ठोस परिणाम दिसायला हवा होता, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवर केवळ चर्चा होऊन प्रत्यक्ष कृती न होणे, भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे तपासे यांनी सांगितले.
दरम्यान, नारीशक्ती वंदन अधिनियमावरून भाजपकडून सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष करून महिला आरक्षणाचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.तसेच, महिला आरक्षण विधेयकाच्या आडून संसद सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत, इंडिया आघाडीने हा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा तपासे यांनी केला.