उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचंच नाव का; यामागे भाजपची नेमकी रणनीती काय?

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केलं आहे. माजी उपराष्ट्रपदी जगदीप धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन उपराष्ट्रपती कोण होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या पदासाठी बरेच नावही चर्चेत होते. मात्र, राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत भाजपने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

विशेष म्हणजे भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत दक्षिणेकडील राज्यातील नेत्यांना पसंती दर्शवली आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन याचंच नाव का? यामागे भाजपची नेमकं रणनीती काय? याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

यामागे दक्षिणेत पक्षाचा विस्तार करणं ही भाजपची मुख्य रणनीती आहे. सी. पी. राधाकृष्णन हे तमिळनाडूच्या कोयंबटूर येथील मोठे नेते आहेत. ते ओबीसी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. अशातच पुढच्या वर्षी तमिळनाडू विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राधाकृष्णन यांच्या उमेदवारीने भाजपने मोठा डाव खेळला आहे.

तमिळनाडूत भाजपला आजवर मोठं यश मिळालेले नाही. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करून दक्षिण भारतात आपली राजकीय पकड मजबूत करण्याच्या भाजपचा प्रयत्न आहे. राधाकृष्णन यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही संबंधित आहेत. यामुळे पक्ष आणि संघ यांच्यातील समन्वय मजबूत होण्यास मदत होणार आहे.

दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तेलंगाना या दोन राज्यात भाजपने यापूर्वी आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी कर्नाटक हे एकमेव असं राज्य आहे, जिथे भाजपने सत्ताही मिळवली. मात्र, तमिळनाडू आणि केरळ या दोन राज्यात त्यांना पक्षाचा म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही.

तमिळ अस्मिता आणि द्रविडवादी विचारधारा यामागे मुख्य कारण आहे. यापूर्वी भाजपने AIADMK आणि इतर छोट्या पक्षांशी युती करून तमिळनाडूत पाय रोवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना तिथे अपेक्षित असं यश मिळाले नाही. 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये द्रमुक-काँग्रेस युतीने तमिळनाडूत चांगली कामगिरी केली.

विशेष म्हणजे या निडवणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नसली तरी 2019 च्या तुलनेत त्यांच्या मतांच्या टक्के वारीत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 3.7 टक्के मत मिळाली होती. तर २०२४ च्या निवडणुकीत ही मत वाढून 11.24 टक्के इतकी झाली आहे. 2026 मधील तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत.