गोपीचंद पडळकरांच्या मोर्चानंतर यवत पेटलं, दोन गटात राडा

महाराष्ट्र

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला असून दोन प्रचंड मोठे गट आमनेसामने आले आहेत. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

यवतमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. हा तणाव सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं निर्माण झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कालच याठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा भव्य मेळावा पार पडला होता. यानंतरच ही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं हा तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात येत आहे.

दौंड तालुक्यातील यवत येथील रेल्वे स्टेशनयेथील निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची रात्री एका अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद यवतसह दौंड तालुक्यात उमटले असून गावागावात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत समोर आलेली माहिती अशी की, रविवारी ( ता. 27) ही घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतरयवतमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. व्यापारी व नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला होता. तसेच गोपीचंद पडळकर आणि संगाम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा मोर्चा काढत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता.

यवतमधील विटंबनेच्या घटनेनंतर सर्व समाजातील नागरीकांनी या घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा यवत पोलिस स्टेशन येथे आला. यावेळी यावेळी पोलीस प्रशासनाला निवेदन देत संबंधित समाजकंटक आणि शिवद्रोहीला त्वरित अटक करुन कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, यवत रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रस्तालगत असलेल्या निळकंठेश्वर मंदिर येथे रात्री मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसची सिंहासनावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची एका तरुणाने विटंबना करण्यात आली होती.

पोलिस अधीक्षक संदीप गिल म्हणाले, दौंड तालुक्यातील यवतमध्ये जी घटना घडली होती. त्यात एका तरुणानं फेसबुक आणि व्हाटस् अपवर एक आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. त्याला पोलिस स्टेशनला घेऊन गेले.त्याच्यावर कारवाई सुरू केली होती,असंही गिल यांनी सांगितलं होतं.

याचदरम्यान, गावातील प्रतिष्ठित लोकांची मीटिंगही घेण्यात आली होती. तोपर्यंत सोशल मीडियावर तो व्हायरल झाला. या घटनेविरोधात गावात तीव्र भावना होती. त्यानंतर गावातील लोक रस्त्यावर आले. जमाव एकत्र करत त्यांनी काही ठिकाणी जाऊन दगडफेक, जाळपोळ केली. पण आता परिस्थिती पूर्णपणे कंट्रोलमध्ये असल्याची माहितीही गिल यांनी दिली आहे.