शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभा प्रचार शिगेला पोहचला असुन कार्यकर्त्यांनी आपल्या सभेत काही गोंधळ घालु नये यासाठी करंदी (ता. शिरुर) येथील डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच गावात आढळरावांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहण्यापासून नोटीस देऊन परावृत्त करण्यात आले. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आडून दुसरंच कोणीतरी वार तर करत नाही ना अशा चर्चांना उधाण आले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या 20 वर्षात कधीच असा प्रकार केला नाही. मग आत्ताच ते असं का वागले…? असा प्रश्न शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांना पडला असुन आढळराव पाटील शिवसेनेत असताना त्यांनी कधीच खुनशीच राजकारण केलं नाही. परंतु सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केल्यानंतर आढळराव पाटील यांना “वाण नाही पण गुण लागला” या म्हणीचा प्रत्यय सध्या करंदीकरांना आला आहे.
या सर्व प्रकारावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना चांगलेच सुनावले आहे. विरोधी उमेदवार खासदार असताना त्यांनी जे शिरुर तालुक्यातील करंदी गाव दत्तक घेतले होते, त्याच गावातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस देऊन दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण आढळराव पाटील यांचा प्रचार दौरा त्या गावात येत असताना विरोधी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये म्हणून नोटीस दिल्या जातात.
मी सुद्धा करंदी गावात प्रचारदरम्यान गेलो होतो. एका कार्यकर्त्याने मला प्रश्न विचारला होता त्याच्या प्रश्नाचे उत्तर आणि त्याच्या शंकांचे निरसन होईल अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने मी त्याचे समाधान केले होते. परंतु विरोधी उमेदवाराला कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली. जे करंदी गाव आपण दत्तक घेतले त्याच दत्तक गावातील लोकांना अशा प्रकारे दडपशाही करुन नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल तर त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. हे स्पष्ट दिसून येत आहे. असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान करंदी (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच बबन उर्फ बबलू ढोकले, जावेद इनामदार, योगेश ढोकले, सागर झेंडे यांना पोलसांनी नोटीस करंदीत होणाऱ्या आढळराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहू नये म्हणून परावृत्त केले. परंतु यावर वरील नोटीस मिळालेल्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही कोणतेही प्रश्न आढळराव यांना विचारणार नव्हतो किंवा ते आमच्या गावात येणार आहेत याची कोणतीही कल्पना नव्हती. याशिवाय अशा दडपशाहीचा प्रकार केल्यास आढळराव पाटील यांचा पराभव निश्चित असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
शिरुरमध्ये ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी