बदलीसाठी दबाव आणणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा अन्यथा…

राजकीय

मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी अद्यापही रुजू झालेले नाहीत. तसेच काही अधिकारी हे त्यांच्या सोयीनुसार त्यांना पदस्थापना मिळावी यासाठी विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही निर्दशनास आले आहे.

परंतु अशा अधिकारी- कर्मचा-यांवर यापुढे कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखविता जे अधिकारी बदलीच्या अथवा पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत, अशा अधिका-यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांची आढावा बैठक संपन्न झाली. याबैठकीला विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिका-यांच्या कामाचा व त्यांच्या कार्यपध्दतीचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेचाही आढावा घेतला.

याप्रसंगी अनेक अधिकारी व कर्मचारी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची विहित कामे मुदतीमध्ये पूर्ण होत नाहीत व त्यांच्या कामाचा ताण हा अन्य अधिका-यांवर पडत असल्याची गंभीर बाब यावेळी मंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आली. या गंभीर विषयांची मंत्री चव्हाण यांनी दखल घेत जे अधिकारी- कर्मचारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने रुजु होणार नाहीत व आपल्या कामाचा पदभार स्वीकारून काम करणार नाहीत. अशा अधिकारी – कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी या बैठकीतच दिले.

रस्त्यावरील खड्यांचा विषय हा सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी चालढकल करीत असल्याचेही निर्दशनास आले आहे. त्यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी मोबाईल ऍप तयार करण्यात यावे. त्याचप्रमाणे खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी कामाची गती वाढविणे गरजेचे असून जी कामे सध्या अपूर्ण आहेत ती काम आता युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही मंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

रस्त्यावरील खड्डयांची कामे पावसाळ्यामुळे अपूर्ण राहिली असतील तर ही कामे कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यानंतर लवकरात लवकर पूर्ण करुन रस्त्यांवरील खड्डे मुक्त करण्याच्या कामाला लागा व जनतेला दिलासा द्या, तसेच या कामाच्यादृष्टीने सर्व अधिका-यांनी आपापल्या पातळीवर नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी दिल्या.

घाट रस्त्यांच्या पर्यायी मार्गाची दुरुस्ती अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे ही दुरुस्ती लवकरात लवकर करावीत. तसेच शासकीय इमारती व हॉस्पिटल आदींची अनेक अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी याबैठकीत अधिका-यांना दिल्या.