मुंबई: महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकाल जाहीर झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाला ८९ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे सर्व २९ नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवले असल्याने राजकीय वर्तुळात ‘हॉटेल पॉलिटिक्स’ची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांवर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
जनमताचा अनादर करणार नाही; एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, “२०१९ साली जनमताचा अनादर करून तत्कालीन ठाकरे गटाने वेगळी सत्ता स्थापन केली होती. मात्र आम्ही तसं करणार नाही. आम्ही जनतेच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने ही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी महायुती एकत्र लढली आहे, त्या सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर निवडून येईल.”
अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला केवळ अफवा
ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, “या सर्व विरोधकांनी पसरवलेल्या अफवा आहेत. आमची लढाई ही सत्ता आणि खुर्चीसाठी नाही, तर मुंबईच्या विकासासाठी आहे. मुंबईकरांना पुढील पाच वर्षांत काय देणार आहोत, यावर आमचं लक्ष आहे.”
नगरसेवक हॉटेलमध्ये का?
नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याबाबत स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “नवनिर्वाचित नगरसेवकांची पक्षाची बैठक घेण्यात आली. त्यांना पुढील पाच वर्षांत काय काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, याबाबत मार्गदर्शन केलं. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.”सध्या शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये मुक्कामी असून, पालिकेतील शिवसेनेचा ‘गट’ तातडीने स्थापन केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबईत महायुतीचाच महापौर; शिंदेंची ठाम भूमिका
मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यांसारख्या महायुतीने एकत्र निवडणूक लढलेल्या सर्व महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल, असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, “कार्यकर्त्यांची अशी भावना असू शकते. मात्र याबाबत महायुतीमध्ये चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल.