तब्बल 700 विद्यार्थ्यांनी साकारले आपल्या मनातील बाप्पा! नक्की पहा..

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): माझाच गणपती छान, तुझ्या गणपतीचे सुपा एवढे कान, तीचा गणेशा किती क्युट, माझा बाप्पा चंद्रावर, तुझा उंदरावर, असा कलकलाट करत तब्बल ७०० विद्यार्थ्यांनी मातीच्या गोळ्याला आकार देत आपल्या मनातील बाप्पा साकारले.

देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे गणेशोत्सव २०२२ निमित्त सोमवार (दि. २९) ऑगस्ट रोजी सुरभी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुरभीचे अध्यक्ष पत्रकार दीपक वाघमारे यांच्या पुढाकारातून सुरुवात नव्या बदलाची, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची! म्हणत देवदैठण आणि परीसरात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या कार्यशाळेत श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशाला विद्यालयातील पन्नास शंभर नव्हे तर तब्बल ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उदंड प्रतिसाद दिला.

प्रशिक्षक अशोक डोळसे यांनी 3 तासाच्या कार्यशाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्व सांगून प्रत्यक्ष कृती करताना शाडू मातीच्या गोळ्यापासून सुलभ पद्धतीने गणपती बनवत उपस्थित मुलांना समजावून सांगितले. त्यानंतर सुरभी संस्थेच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक किलो मातीचा गोळा देण्यात आला.

आपल्यातील सुप्त गुणांची मुक्तपणे उधळण करत विद्यार्थ्यांनी मातीच्या गोळयाला आपापल्या कल्पने प्रमाणे आकार देताना कुणी चंद्रावर बसलेला, कुणी उंदरावर स्वार झालेला, कुणी लाडू खाताना, कुणी ऐटीत बसलेला तर कुणी उभे असलेले गणपती बाप्पा साकारण्यात मुले मग्न झाली. प्रत्यक्ष गणपती बनवताना हर्षदा डोळसे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

2 तासात ७०० वेगवेगळ्या गणेश मुर्ती तयार झाल्याने वातावरण गणपतीमय झाले. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या घरी स्वतः तयार केलेल्या गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहे. देवदैठण सहकारी संस्थेचे अध्यक्ष अतुल लोखंडे, राजापूरचे माजी उपसरपंच अशोक ईश्वरे, नवनाथ शिंदे यांनी कार्यशाळेला सदिच्छा भेट दिली.

अशोक ईश्वरे यांनी सर्वोत्तम पहिल्या 3 गणेश मुर्तींना पारितोषिक देऊन मुलांचे कौतुक केले. तर सचिन दंडवते, बाबू राक्षे, डॉ. विकास पाटील यांनी विशेष आर्थिक मदत करुन सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयोजक संदिप भवर, दिपक लोखंडे, सतिषदादा कौठाळे, मनेष गव्हाणे, सचिन माने, शरद वाघमारे, ओंकार कौठाळे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक कलाशिक्षक संदिप वेताळ यांनी केले. तर मुख्याध्यापक बाळासाहेब दहिफळे यांनी आभार मानले.

विविध प्रकारच्या रसायन मिश्रीत माती व रंगांचा वापर करुन तयार केलेल्या गणेश मुर्तींचे पाण्यात विसर्जन केल्याने दुषित झालेले पाणी हे सर्व सजीव सृष्टीच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी यापुढील काळात गणेशोत्सव व इतर सणही पर्यावरणपूरक साजरे करणे गरजेचे असल्याने आपण हा सामाजिक उपक्रम राबविला आहे.