सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:- नाथा शेवाळे

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): राज्यात गेल्या अनेक दिवसांपासुन अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ऑक्टोबर महिना सुरु झाला तरी राज्यात पावसाने अजून माघार घेतलेली नाही. मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची कांदा, कापूस, सोयाबीन आणि इतर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट झाले आहे.

याबाबत राज्य सरकारने पाहणी करुन त्वरित पंचनामे करावेत. तसेच महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जनता दल (से) महाराष्ट्र च्या वतीने शेवाळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.