मुंबई: महाराष्ट्रात रविवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या वृत्तांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सपकाळ म्हणाले की, भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपरफुटीशिवाय पार पाडता येत नाही. नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता TET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भविष्यावर पाणी फेरले जात असून, पेपरफुटी रॅकेटला नेमके कुणाचे राजकीय संरक्षण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थी अभ्यास करण्याऐवजी पेपर आधीच कुणाकडे पोहोचतोय याची चिंता करत आहेत. हा प्रकार प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून, पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे शोधून काढून कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी देशभर संताप व्यक्त झाला, मात्र अद्याप केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराकडे भाजपा सरकार डोळेझाक करत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.तरुण हे देशाचे भविष्य असून त्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.