उद्धव ठाकरेंचा ‘तो’ नेता भाजपाच्या दरबारात

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जनता दरबारचं आयोजन केलं होतं.. मुंबई महापालिकेतील जी उत्तर विभागात उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. आमदारांची पालकमंत्र्यांच्या जनतादरबारातील हजेरी चर्चचा विषय ठरला.

लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेले जनता दरबार म्हटलं की त्यामध्ये जनतेची गा-हाणी आलीच. मात्र मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागासाठी उपनगर पालकमंत्री आशिष शेलारांनी जनता दरबार भरवला. हा जी उत्तर विभाग म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार महेश सावंत यांचा मतदारसंघ. दादरसारख्या मध्यवर्ती आणि बाजारपेठ असलेल्या भागाच्या अनेक समस्या आहेत, आणि याच अडचणी घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत स्वता या जनता दरबारात पोहोचले.

जनता दरबार भाजपचा नाही, तर सरकारचा आहे असं महेश सावंत यांनी सांगितलं आहे. मंत्री कोणत्या पक्षाचे नसतात. भाजपाचा वलय असला तरी मंत्री हा सर्वसामान्यांचा असतो. मीदेखील आमदार झाल्यापासून जनता दरबार घेत आहे. सगळेच प्रश्न सुटत नाहीत. एखाद, दुसरा प्रश्न सुटला तरी जनतेला तेवढा दिलासा मिळतो असं ते म्हणाले.

जनता दरबार जनतेचा असून, मीदेखील जनता आहे. मी आमदारही आहे आणि जनताही. इथे कोणत्याही वैयक्तिक पक्षाचा जनता दरबार नसून, हा जनतेसाठी मंत्र्यांनी सरकारने ठेवलेला जनता दरबार आहे असंही ते म्हणाले.

जनतेचा एक भाग म्हणून आलेले आमदार महेश सावंतांनी दादरमधल्या समस्या घेऊन पोहचले, मात्र विरोधी पक्षातील आमदार स्वता पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात आल्याने राजकीय चर्चा जोरात होती. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांनीही आमदार सावंत यांचं स्वागतच असल्याची प्रतिक्रिया दिली. या मतदारसंघात राहणाऱ्या सर्व नागरिकांचं आणि त्यांचंही स्वागत आहे असं ते म्हणाले.

रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगबेरंगी फुलांचे आकर्षक बुके .. रंगसंगती साधणारी विद्युत रोषणाई. एखाद्या लग्नमंडपात शोभेल अशी ही सजावटीमुळे हा पालकमंत्र्यांनी जनतेची गा-हाणी ऐकण्यासाठी ठेवलेला जनता दरबार आहे की एखाद्या लग्नाचा मंडप असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण अशा या अनावश्यक खर्चाची आवश्यकता नसल्याचं आमदार महेश सावंतांनी सुनावलं.

वॉर्ड ऑफिसरला किंवा पालिकेला पाठीवर थाप हवी असेल. यासाठी इतका खर्च केला असेल. मंत्र्यांनी इतका खर्च करण्यासाठी सांगितलं असेल असं वाटत नाही. शेड लावले असते तरी लोक बसले असते असं महेश सावंत म्हणाले.

स्वत: मुंबई उपनगर पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या या जनता दरबारात मुंबईचं ह्रदय समजल्या जाणा-या दादरच्या समस्या वाचल्या गेल्या. मात्र या भागाचे आमदारचं तेही विरोधी पक्षातील आमदार समस्या घेऊन या जनता दरबारात हजर राहिल्याने राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली.