सामाजिक बांधिलकीचे भान जपत जीवन कृतार्थ करणारी विद्या तप, तेज, संयम आणि सातत्याने साकारणे ही काळाची गरज आहे. ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.. शिक्षण विचारांची ज्ञानसंपदा आणि जीवनश्रध्देचा मूर्तिमंत अविष्कार आहे. शिक्षक ते राष्ट्रपती असा प्रवास साकारताना अज्ञान, अविवेक, अविचार, आग्रह यापासून दूर जात शिक्षण हे राष्ट्रीय विकासाचा पाया आहे हे त्यांनी आपल्या जीवनशैलीद्वारे सिद्ध केले आहे. मुले – मुली ही राष्ट्राची अव्दितीय संपत्ती आहे, त्यांच्या जीवनाचा अभ्यास आणि व्यक्तिमत्वाची अगत्यपूर्वक जडणघडण हा शिक्षकांचा स्वधर्म असला पाहीजे हा भाग अधोरेखित होतो. त्यांच्या जयंतीस आज तमाम शिक्षण प्रेमींच्या वतीने विनम्र अभिवादन.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने नवीन शिक्षण विषयक धोरण व शिक्षकांचे योगदान याबाबत घेतलेला अल्पसा विचार सोबत व्यक्त केला आहे.
शिक्षणाचे सामर्थ्य :
इमारती, खोल्या, वर्ग यात शिक्षण बंदिस्त ठेऊन शिक्षणाचे सामर्थ्य प्रकट होणार नाही.
नव्या माध्यमांचा उपयोग करून या भिंतीरूप अडथळ्यांना दूर करावेच लागेल. हे अडथळे दूर केले तरच आजवर लांब राहीलेले अनेक जणही या प्रवाहात सामील होतील.
मुलांचे भावविश्व, भावनाविश्व आणि देशाचा विकास याकरिता खात्रीलायक मार्ग म्हणजे नवीन बदलाचा स्वीकार करत आपले भविष्य आपणास लिहावे लागेल.
शिकण – शिकविणे महत्वाचे, परंतू सामाजीक लक्ष हे मूल्यमापनाकडेच आहे. खर म्हणजे वर्गातील अध्यापन प्रक्रीया प्रभावी असेल तर मुलांच्या क्षमतावृद्धीत वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.
यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधे शिक्षणविषयक मसुदा व त्याअनुषंगाने पायाभूत शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षणाबाबत अनेक विचारप्रवाह नमूद करणेत आले आहेत.
धोरणाची गरज व सुधारणा का करावी :
याबाबतही विचारमंथन सुरूच आहे. ३४ वर्षानंतर आपण नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करणेस सुरुवात करत आहोत.
स्वातंत्र्यापासून आपण गुणवत्तेसाठी झटत आहोत. शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण क्षमता प्राप्त होणे ही शिक्षण घटकांकडून अपेक्षा आहे.
गेल्या ३ दशकांमधे शिक्षण क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे घडली आहेत. केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायदा, सर्व शिक्षा मोहिम, माध्यान्ह शालेय पोषण आहार योजना, सरल प्रणाली, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व अंमलबजावणी, ऑनलाइन शिष्यवृत्ती, शालार्थ योजना, शालार्थ आयडी, शिक्षकांची संचमान्यता, जुनी – नवी पेंशन योजना, पवित्र पोर्टल, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, ११ वी ग्रामीण भागातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट, उच्चत्तर शिक्षण अभियान या आणि अशा अनेक कार्यक्रमांची अंमलबजावणी देशभर सुरु आहे.
अशातच प्रत्येक महिन्यात साक्षरता मोहिम ते संगणक तंत्रज्ञान या विषयांची व्याप्ती वाढून गुणवत्तेचे संवर्धन हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तांत्रिक कौशल्याने आपण कितीही पुढे गेलो तरी अनुसुचित जाती – जमाती, अल्पसंख्यांक समाज, आदिवासी व दुर्गम भागातील मुला – मुलींची गळती, उपस्थिती याबाबत बरेच कामकाज पूर्ण करावे लागेल. दर्जेदार शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यासाठी जागतीक शिक्षणांत होणारी गुंतवणूक विचारात घेऊन शालेय शिक्षणाबाबत आर्थिक गुंतवणूक वाढविणे क्रमप्राप्त आहे.
शैक्षणिक तुलना :
अशातच परदेशी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खाजगी क्षेत्रांची शिक्षणातील भूमिका याबाबत धोरण निश्चितीत बदल करावा असे वाटते.
देशस्तरावर १ ली त दाखल झालेले किती टक्के विद्यार्थी पदवी – पदव्युत्तर शिक्षणासाठी दाखल होतात हे मोठे आव्हानच आहे. प्रगत देशातील प्रमाण लक्षात घेता हे प्रमाण वाढणे आवश्यक आहे.
विद्यार्थी संख्येचे प्रमाण – शिक्षकांची उपलब्धता, व्यवस्थापन प्रक्रीयेतील वाढता हस्तक्षेप, प्रशिक्षणांची परिणामकारक अंमलबजावणी, अध्ययन – निष्पत्ती बाबतचा अहवाल या आणि अशा अनेक बाबी देशाला जागतिक स्तरावर नेण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
शिक्षणातून रोजगारक्षम विद्यार्थी, व्यावसायिक कौशल्याने युक्त विद्यार्थी आणि जीवनाशी संबंध जोडणारे अभ्यासक्रम ही आजची गरज आहे. त्यादृष्टीने उपयुक्तता मूल्य असणारे कौशल्य शिक्षण नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधे समाविष्ट झाले आहे ही आनंददायी बाब आहे.
नाविन्याचा ध्यास :
नवीन सर्वंकष राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. यादृष्टीने सर्वांनी सज्ज होऊन शिक्षण व्यवस्थेचा यज्ञ प्रज्वलीत ठेवणेकामी कटिबद्ध राहूया. अभ्यासक्रमातील बदल प्रतिबिंबित होण्यासाठी राज्य – राष्ट्रीय अभ्यासक्रमाचे बारकाईने अवलोकन करावे लागेल. सामाजीक व्यवस्था, शाळा, शालेय संस्कृती, तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, अध्ययन – निष्पत्ती, समाधानकारक अध्ययन – अध्यापन इ. बाबतीत विद्यार्थ्यांच्या नागरिकत्वाचे संवर्धन ही जबाबदारी पार पाडावीच लागेल.
शिक्षकांचे महत्व कायम :
आपल्या देशातील उद्योगपती, राजकीय नेते, खेळाडू, कलाकार, शास्त्रज्ञ, समाजसेवक यांचे आपण नेहमीच कौतुक करतो. पण या सगळ्यांच्या जडण-घडणीमागे त्यांच्या शिक्षकांचा हातभार आहे याची जाणीव कायम रहावी. भारताच्या सर्वोच्च नेत्यांपैकी डॉ. राधाकृष्णन, वेंकटरामन, डॉ. अब्दुल कलाम, डॉ. शंकर दयाळ शर्मा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतींनी उच्च पदावर आल्यावरही शिक्षकांचे महत्व कायम केले आहे. आम्हा सर्वांना त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे.
शब्दांकन-
प्राचार्य रामदास थिटे
श्री संभाजीराजे विद्या संकुल, जातेगाव बु.॥, ता. शिरूर, जि. पुणे.
चौफेर वाचनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास : प्राचार्य थिटे
प्राचार्य रामदास थिटे यांचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान…
योगासनाला जीवनाचा भाग करून घेणे गरजेचे; प्रा. रामदास थिटे
प्राचार्य रामदास थिटे यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार!