मुंबई: मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह देशातील शेकडो तरुणांची आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करून त्यांना म्यानमार-थायलंड सीमेवरील छळछावण्यांमध्ये डांबून जबरदस्तीने सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन संबंधित तरुणांच्या तातडीच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील २० ते २५ तरुण, तर देशभरातील सुमारे ७०० ते ८०० तरुण म्यानमार-थायलंड सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरातील छळछावणीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणांना शारीरिक छळ करून त्यांच्याकडून सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याची तक्रार बीड सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणांपर्यंत पोहोचला असून, अडकलेले तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून सुटकेचे प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे धनंजय मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयातून संबंधित तरुणांची सुरक्षित सुटका करण्यात यावी. तसेच सोशल मीडियाद्वारे मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.