मुंबई: अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा ११.४० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हे स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे.
सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी खासदार म्हणून तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांमुळे बारामतीकरांचे आधुनिक रेल्वे स्थानकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे.
१९१४ पासूनचा इतिहास असलेल्या बारामती रेल्वे स्थानकाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता त्याचे अत्याधुनिक स्वरूपात आधुनिकीकरण करण्यात आले आहे. स्थानकावर दिव्यांग-अनुकूल सुविधा, आधुनिक प्रतीक्षालय, प्रशस्त पार्किंग, आकर्षक प्रादेशिक स्थापत्यशैली आणि प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या स्थानकातून दररोज सुमारे १,८०० प्रवासी प्रवास करतात.
बारामती हे राज्यातील महत्त्वाचे कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्याने या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, दळणवळण, उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.