मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

महाराष्ट्र

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी करण्यात आले. बारामती रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपस्थित राहून पुनर्विकसित स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण केले.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, कृषी आणि शैक्षणिक विकासाला गती देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे आधुनिकतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून अमृत भारत स्टेशन योजना हा त्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुमारे २६.५ कोटी रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. स्थानकात आधुनिक प्रतीक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ सुविधा, सौरऊर्जा प्रणाली तसेच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष दालन उभारण्यात आले आहे.

या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. २,०८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमानंतर सुनेत्रा पवार यांनी पुनर्विकसित स्थानकाची पाहणी केली. तसेच रेल्वेत जाऊन विक्रेते आणि प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अनुभव जाणून घेतले.

या कार्यक्रमाला पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, रेल्वे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत