सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप; पार्थ पवारांच्या शरद पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य असल्याचा आक्षेप पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा स्मरणपत्र पाठवले आहे.

सच्चिदानंद सिंह यांच्या दाव्यानुसार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पक्षाच्या घटनेनुसार झाली नाही. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिकृत निवडणूक प्राधिकरण उपस्थित नव्हते, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच स्वतःसह इतर प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची किंवा मतदान करण्याची संधी देण्यात आली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रक्रियेच्या आधारे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड रद्दबातल ठरवावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. यापूर्वी ९ जुलै २०२६ रोजीही त्यांनी पक्ष नेतृत्वाला नोटीस पाठवून निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. आता पुन्हा स्मरणपत्र पाठवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बारामती विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.

पार्थ पवारांची शरद पवारांशी भेट

या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

पार्थ पवार यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षांतर्गत आक्षेप घेतला जात असतानाच पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील ही प्रदीर्घ भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आगामी राजकीय समीकरणे, पक्षांतर्गत घडामोडी आणि दोन्ही गटांमधील संभाव्य हालचालींबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत