bahurupi-somnath-shinde

चला साहेब लोक आलेत बिन पगारी अन् फुल अधिकारी; लग्नाला चला…

महाराष्ट्र

शिरूर : अंगात खाकी वर्दी चढवून गावोगावी आपल्या चपखल शब्द आणि वाक्य रचनेतून लोकांना हसायला लावणारा बहुरूपी समाज आजही आपली परंपरा जोपासताना दिसत आहे. पण, काळाच्या ओघात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून बहुरूपी समाज अस्तित्वात आहे. शिवरायांच्या काळात गुप्त पद्धतीने माहिती मिळवण्याचे काम हा समाज करायचा. शिवरायांच्या काळात या बहुरूपी समाजाला राजाश्रय होता. आजही बहुरूपी समाज आपली कला आणि संस्कृती जोपासत असून गावागावांत जाऊन विनोदी शैलीत लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील बहुरूपी सोमनाथ शिवाजी शिंदे (वय १८, मो. ८४८३०५९१८०) हे आहेत. सोमनाथ शिंदे हे पोलिसांची वर्दी घालून गावोगावी बहुरूपी कला सादर करून नागरिकांना हसवतात. घरोघरी आणि दुकानात कला सादर करून पैसे मागतात. अन् त्यावरच आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. बहुरूपी समाजाकडे असलेली कला हेच त्यांचे जीवन जगण्याचे साधन आहे. त्यामुळे वर्षभर दर मुक्काम दर कोस करत सोमनाथ याचे कुटुंब फिरस्तीवर असते. मिळेल त्या जागेवर राहायचे. दिवसभर लोकांचे मनोरंजन करायचे. लोकांनी दिलेल्या दहा-वीस रुपये जमा करून त्यावरच उदरनिर्वाह करायचा.

आमची बहुरूपी कला पारंपारिक असल्यामुळे आम्हाला गावो-गावी फिरण्यासाठी जावे लागते. पहिले आमच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतेही साधनं नव्हते. त्यामुळे आम्ही आमची कला सादर करून उदरनिर्वाह करायचो. पूर्वी सोंग निघायचे. लेकरं बाळासहित गावोगावी भटकंती करून आम्ही ही कला सादर करत. पूर्वी मनोरंजनाची साधने नव्हती त्यामुळे आमच्या कलेच खूप महत्त्व होत. लोक खूप द्यायची आता मात्र लोक तेवढी किंमत देत नाहीत. तरीदेखील आम्ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून पिढ्यान् पिढ्यान् चालत आलेली परंपरा जपत आहोत, असे सोमनाथ शिंदे सांगतात.

पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज अजूनही राज्यभर भटकंती करीत आहे. गावकुसाबाहेर पालामध्ये राहून दिवसभर गावात किंवा शहरात बहुरुपी लोकांचे मनोरंजन करतात. सोमनाथ शिंदे म्हणाले, ‘कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आमच्याकडे काहीच नाही. कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम करतो. कधी पैसे मिळतात तर कधी मोकळ्या हाताने परतावे लागते. आमच्याकडे साधे रेशन कार्ड सुद्धा नाही. त्यामुळे सरकारने आमच्यासाठी काही तरी करणे गरजेचे आहे. दारोदारी फिरून भीक मागणे कोणाला आवडेल? पण, पोटासाठी हे करावे लागते. काही नागरिक मान-सन्मान देतात तर काही जण तिरस्कार करतात. पण, आम्ही तसेच हासून पुढे जात असतो.’

‘आजोबा-वडिलांनी आयुष्यभर बहुरुपी म्हणून समाज प्रबोधनाचे काम केले. आई-वडिल थकले आहेत. दोन भाऊ आणि तीन बहिणी. बहिणींची लग्न झाली आहेत. उदरनिर्वासाठी दुसरे कोणतेच साधन नसल्यामुळे दररोजचे जीवन जगताना खूप अडचणी येतात. सहा महिने उसतोड मजूर म्हणून काम करतो तर सहा महिने बहुरुपी म्हणून. महागाईच्या जमाना आहे. पण, दिवसभर फिरल्यानंतरही फार पैसे मिळत नाही. पण, ही संस्कृती पुढे टिकवण्याचे काम करत आहे, असेही सोमनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, सोमनाथ यांच्याकडे मोबाईल आहे. पण, त्यावर गुगल पे नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या काकांचा मदतीसाठी मोबाईल क्रमांक दिला आहे. तो पुढीलप्रमाणे- गुगुल पे- ८९९९०७३२८३

लग्नाला चला तूम्ही लग्नाला चला
ठकूताई, सकुताई, लग्नाला चला
चला काकू चला काकू लग्नाला चला ||
जेवायला केली चिखलाची कढी
दगडाची वडी, मस्करी लोणचं
गाढवाचं भजं, तरसाच्या पोळ्या
लांडग्याची खीर, जेवायला चला
तुम्ही जेवायला चला ||

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा…
https://www.youtube.com/shorts/KzCYWK5cZ1E