24 तासात एकाच घरातील चार जणांचा मृत्यू…

क्राईम महाराष्ट्र

बारामती: बारामतीच्या रस्त्यावरील भयानक वेगाने काल एका निष्पाप कुटुंबातील तिघाजणांचे बळी घेतल्यानंतर ओंकार आचार्यच्या वडिलांचेही आज पहाटे निधन झाले. राजेंद्र श्रीनिवास आचार्य हे निवृत्त शिक्षक होते.

काल बारामतीच नाही, तर संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणारी घटना बारामतीत घडली. कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेले आचार्य कुटुंब संपले. काल दिवसभर बारामती सुन्न होती. संध्याकाळच्या साडेसात वाजता च्या वेळी ओंकार आणि त्यांच्या दोन्ही मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आज पहाटे ओंकार चे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र आचार्य हे आजारी होते. बारामतीतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना अपघाताच्या घटनेच्या आधी म्हणजे शनिवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांची प्रकृती तशी नाजूक होती, मात्र कालच्या घटनेने प्रचंड धक्का बसलेल्या राजेंद्र आचार्य यांनी आज शेवटचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांनीदेखील इहलोकीची यात्रा संपवली.

हा विकासाच्या भयावह वेगाला आणि कलियुगातल्या दशरथाला शाप..

काल ओंकार आणि त्याची मुलगी सई व माधुरी यांचा बळी घेणारा हायवा डंपरच्या चालक दशरथ होता. पुराणकाळात देखील दशरथाला श्रावणबाळाच्या आई वडिलांनी शाप दिला होता. सध्याही हिंदुत्वाचे युग आहे. प्रत्येकाच्या तोंडी रामायण महाभारत आहे.. काल देखील बारामतीत कलियुगाच्या दशरथाने आपल्या श्रावणबाळाचे प्राण घेतले हा विरह सहन न झाल्याने त्या बापाने देखील प्राण सोडला.

बारामतीतच नव्हे तर राज्यात विकास भयावह वेगाने वाहतो आहे. दीडविताच्या पोटासाठी भाकरीचा चंद्र शोधताना प्रत्येक जण जीवाच्या आकांताने धावपळ करतो आहे आणि तोच वेग दुसऱ्याचा जीव घेतो आहे. निष्काळजीपणा दुसऱ्याच्या जीवावर बेततो हे माहीत असूनही बारामतीत अनेक घटना घडूनही हायवा डंपरच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. फक्त हप्त्यावरच सगळे भागणार आहे का? जे कोणी हे पाप करते आहे, त्यांची ही मुले रस्त्यावर फिरत असणारच ना? थोडी सद्सद्विवेकबुद्धी शिल्लक असेल, तर प्रशासनातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी यावर काहीतरी उपाय काढायला हवा. नाहीतर सातत्याने अशा घटना घडत राहतील.. गरिबांच्या घरातील मुले मरतील आणि त्या त्यावेळी फक्त निषेधाचे दोन सूर ऐकायला मिळतील.