नकुशा तांबे आत्महत्या प्रकरण; आरोपी निर्दोष मुक्त, वकिलांच्या संयमशील युक्तिवादाचे कौतुक

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरूर) येथील नकुशा अनिल तांबे (वय २५) हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचे पती अनिल चिंधू तांबे, सासरा चिंधू सिदू तांबे आणि सासू मुक्ताबाई चिंधू तांबे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याचा निकाल सोमवारी (२१ जुलै २०२५) पुण्यातील एस. जी. जोशी यांच्या न्यायालयात जाहीर करण्यात आला.

नकुशाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर २० नोव्हेंबर २०१९ रोजी तिचे वडील मालू गोपाळा करगळ यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद देत तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्यादरम्यान अनेक साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली आणि त्यांची उलट तपासणीही झाली. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व पुरावे तपासून घेण्यात आले. यामध्ये बचाव पक्षाच्या वतीने कोर्टात प्रभावी व तर्कशुद्ध युक्तिवाद सादर करण्यात आला.

बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, मयत नकुशाला सासरी चांगली वागणूक मिळत होती. तिच्या चारित्र्यावर कुठलाही संशय घेण्याजोगा आधार नव्हता. त्या दिवशी नकुशा विहिरीवर पाणी भरताना अपघाताने तोल जाऊन विहिरीत पडली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या बाजूला विश्वासार्ह साक्षी व पुरावे जोडले गेले.

विशेष म्हणजे बचाव पक्षाने युक्तिवाद करताना मयत विवाहिता नकुशा तांबे हिच्याविषयी आदरपूर्वक भाष्य केले. कोणताही अपशब्द न वापरता, खटला संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत रेटून नेण्यात आला. ही बाब न्यायालयीन वर्तुळात विशेष कौतुकास पात्र ठरली.या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. स्वप्नील सातव, ॲड. मयूर करचे, ॲड. मृणाल भोईटे, ॲड. शुभम कावळे, ॲड. तृप्ती पवार, ॲड. तुषार तांदळे यांनी संयुक्तपणे अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद युक्तिवाद सादर केला. त्यांच्या संवेदनशील आणि कायदायुक्त युक्तिवादामुळे आरोपी निर्दोष सुटले.

न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, आरोपींवर आरोप सिद्ध होण्यासाठी आवश्यक ठोस पुरावे सरकारी पक्ष सादर करू शकला नाही. त्यामुळे तिघांनाही निर्दोष मुक्त करण्यात येत आहे.हा निकाल पाच वर्षांच्या प्रदीर्घ न्यायप्रक्रियेनंतर आला असून, यामध्ये वकिलांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मृत व्यक्तीविषयी आदर राखून चालवलेली न्यायालयीन प्रक्रिया हीच न्यायालयीन सन्मानाची खरी ओळख असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.