शिरुर (अरुणकुमार मोटे) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे इस्रो (ISRO) आणि नासा (NASA) या नामवंत अंतराळ संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा ५ जुलै २०२५ रोजी पार पडली. निकाल १७ जुलै रोजी जाहीर झाला. मात्र निकालानंतर ‘गुणानुक्रमाने निवड’ न करता ‘तालुका कोट्यानुसार’ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असुन, शैक्षणिकदृष्ट्या प्रगत तालुक्यांतील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
या परीक्षेबाबत कुठलीही नियमावली परीक्षा पुर्वी जाहीर करण्यात आलेली नव्हती. परीक्षा किती गुणांची…? निवड कशी होणार…? याबाबत पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. निकालानंतर अचानक तालुकानिहाय कोटा घोषित करत विद्यार्थी निवड करण्यात आली.
संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील सहावी व सातवीच्या १३,६९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. नियोजनानुसार केवळ १०% हुशार विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी निवड होणार होती. मात्र तालुकानिहाय कोट्यामुळे गुण जास्त असणारे विद्यार्थी वगळले गेले आहेत.
तालुकानिहाय कट ऑफ गुण, तालुका कट ऑफ मार्क्स पुढीलप्रमाणे..
शिरूर -५३ गुण, खेड – ४८गुण, आंबेगाव-हवेली ४५ गुण, इंदापूर-मावळ-पुरंदर ४३ गुण, बारामती-जुन्नर-मुळशी-वेल्हा- ४० गुण, भोर-दौंड- ३८ गुण…
शिरुर तालुक्यातील ५० गुण मिळवणारा विद्यार्थी वगळला गेला, तर दौंड तालुक्यातील ३८ गुण मिळवणारा विद्यार्थी मात्र निवडला गेला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शिरुर, खेड, आंबेगाव, हवेली या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांचा दर्जा चांगला आहे. स्थानिक शिक्षक, पालक आणि पदाधिकारी शाळांना टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. अशा गुणवत्तावान तालुक्यांतील विद्यार्थ्यांना डावलून मागास शैक्षणिक तालुक्यांना प्राधान्य दिल्याने गुणवत्तेचा दंड दिला जात असल्याचे अनेक शिक्षकांचे मत आहे.
या निर्णयामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली .आहे. दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेच्या आधी तरी जिल्हा परिषदेकडून पारदर्शक नियमावली जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून इस्रो-नासा अभ्यासदौऱ्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करताना पारदर्शकतेचा अभाव दिसून आला आहे. गुणवत्तेवर आधारित निवड ऐवजी कोट्यावर आधारित निवड ही शिक्षण क्षेत्रासाठी घातक ठरू शकते. जिल्हा परिषदेने हा निर्णय पुनर्विचारात घेऊन हुशार आणि पात्र विद्यार्थ्यांनाच संधी द्यावी, हीच विद्यार्थ्यांची आणि पालकांची मागणी आहे.
शिरुर तालुक्यातील पेट्रोल पंपात चोरी; चार कामगारांवर गुन्हा दाखल
रांजणगाव गणपती येथे पुणे-नगर महामार्गालगत धोकादायक बॅनर होल्डिंग…?