विळ्याने वार करून सावत्र आईचा खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न…

क्राईम महाराष्ट्र

संभाजीनगर: कौटुंबिक शेतजमिनीच्या वादातून ४८ वर्षीय सावत्र आईची ३३ वर्षांच्या मुलाने धारदार विळ्याने गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी अगरसायगाव येथे घडला. आशाबाई घमाजी जाधव (रा. अगरसायगाव, ता. वैजापूर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

रागात आईची विळ्याने हत्या केल्यानंतर मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला सुखरूपपणे बाहेर काढले. याची महिती पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी आरोपी नानासाहेब जाधवला ताब्यात घेतले.

सविस्तर माहिती अशी की, अगरसायगाव येथील नानासाहेब जाधव याचे शेतजमिनीवरून सावत्र आई आशाबाई यांच्याशी शनिवारी भांडण होऊन शाब्दिक चकमक उडाली होती. रागाच्या भरात नानासाहेब याने सावत्र आईच्या गळा व चेहऱ्यावर विळ्याने वार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भांबावलेल्या नानासाहेबने शेतातील विहिरीकडे पळत जाऊन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले.

घटनेची माहिती वैजापूर पोलिसांना दिल्यानंतर वैजापूर ठाण्याचे निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक पाटील, उपनिरीक्षक रज्जाक शेख, ज्ञानेश्वर शिंदे, भगवान सिंगल, पवार, गणेश पठारे, आय बाइक पथकाचे जोनवाल गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.