मुंबई: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. घरात डबल एलिमिनेशन झाल्याची जोरदार चर्चा रंगली असून दोन दमदार स्पर्धकांचा प्रवास संपल्याचं बोललं जात आहे. या घडामोडींमुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली असून आजच्या ‘भाऊच्या धक्क्या’कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आयुष संजीवचा प्रवास थांबला
अभिनेता आयुष संजीव याचा शोमधील प्रवास संपल्याची माहिती समोर येत आहे. शांत स्वभाव, नेमकी रणनीती आणि टास्कमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आयुषला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं.मात्र, मागील काही दिवसांपासून तो घरात कमी सक्रिय दिसत होता. जुन्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रकृतीच्या कारणामुळेच त्याचा प्रवास थांबला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
करण सोनावणेही बाहेर?
सोशल मीडियावर ‘फोकस इंडिया’ नावाने ओळखला जाणारा इन्फ्लुएन्सर करण सोनवणे हाही घराबाहेर पडल्याचं समोर येत आहे. करणचा विनोदी अंदाज आणि घरातील सदस्यांशी असलेली मैत्री प्रेक्षकांना भावत होती.
विशेष म्हणजे त्याची आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली होती. या दोघांच्या नात्याबाबत अनेक तर्क-वितर्क रंगले होते. मात्र करणच्या बाहेर पडण्याने ही गोष्ट अपुरीच राहिल्याचं बोललं जात आहे.
‘भाऊचा धक्का’त रितेशचा संताप
या आठवड्यातील ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख यांचा संताप पाहायला मिळणार असल्याची माहिती आहे. घरातील गैरवर्तनावरून रितेशनं रुचीता जामदार हिला कठोर शब्दांत सुनावल्याचं समजतंय.तसंच विशाल कोटीन यानं दीपाली सय्यद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही रितेशनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापल्याचं चित्र आहे.
बदलणार घरातील समीकरणं?
डबल एलिमिनेशनमुळे घरातील समीकरणं पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. मजबूत स्पर्धक बाहेर पडल्याने पुढील आठवड्यात आणखी अनपेक्षित घडामोडी घडू शकतात.आता अधिकृत घोषणा काय होते आणि आजच्या भागात नेमकं काय उलगडतं, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.