शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्याची मागणी करत तहसीलदारांकडे अधिकृत अर्ज सादर केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२२ मध्ये पार पडली असून, ३० ऑगस्ट २०२२ पासून दत्तात्रय जोरी हे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. मात्र, सदस्यांनी दिलेल्या अर्जात सरपंचांवर कामकाजात सदस्यांचा विश्वास न ठेवणे, मनमानी पद्धतीने कारभार करणे तसेच गावाच्या विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सदर परिस्थितीत ग्रामपंचायतीचे सुचारू प्रशासन राखण्यासाठी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव आणणे आवश्यक असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३५ अन्वये विशेष सभा बोलावून अविश्वास ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात तहसीलदारांनी कायदेशीर प्रक्रिया राबवून पुढील कारवाई करावी, अशी विनंती अर्जदार सदस्यांनी केली आहे. या अर्जावर ग्रामपंचायतीतील आठ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून, त्यात गोरक्ष गजानन गाजरे, सुप्रिया ज्ञानेश्वर जगताप, दिपाली दिलीप दुंडे, राणी उमेश बोऱ्हाडे, राहुल रावसाहेब जगताप, सुभाष रामचंद्र जगताप, पोपटलाल नेनसुख फिरोदिया व रेखा तुळशीराम खुपटे यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढे कोणत्या घडामोडी घडतात याकडे जांबुत ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.