नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व बायपास रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. सतत होणाऱ्या अपघातांमुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे शिरूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट गडद होत असून “दररोज घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शिरूर बायपास रस्त्यावर नियंत्रणाविना धावणारी वाहने, ट्रॅक्टर–ट्रॉली, मालवाहतूक गाड्यांचा बेफाम वेग आणि ट्रकचालकांची बेजबाबदार ड्रायव्हिंग यामुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा ट्रॅप बनला आहे. रात्री प्रकाशयोजनेचा पूर्ण अभाव असल्याने वाहनचालकांना समोरचा रस्ता दिसत नाही आणि यामुळे अनेक अपघात घडत आहेत.
शिरूर बायपासवरील तीन अंडरपासपैकी काही ठिकाणी योग्य उतार–चढाव न दिल्याने वाहनचालकांचे संतुलन बिघडत असून वारंवार अपघात घडत आहेत. वाहनचालकांनी या अंडरपासचे काम तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनमानी कारभार यातून दिसून येतो. चुकीच्या पद्धतीने हे अंडरपास काढल्यामुळे वाहन क्रॉसिंग करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे शहर परिसरात वाढती वाहने, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि अशास्त्रीय पद्धतीने केलेले स्पीड ब्रेकर नागरिक व वाहनधारकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहेत.
सरदवाडी परिसरातील नीट चिन्हांकित न केलेले बेकायदेशीर स्पीड ब्रेकर, अचानक येणारे उंच उठाव यामुळे गाडी घसरून वारंवार अपघात झाले आहेत.पुणे–अहिल्यानगर महामार्गाचे सुरू असलेले नवे काम पूर्ण झाल्यावर शिरूर शहरात आणखी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. महामार्गावरील मोठ्या वाहनांचे शहरात होणारे वळण हे आगामी दिवसांत मोठे संकट ठरू शकते.
नागरिकांचा आरोप आहे की वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांचे दुर्लक्ष सुरूच आहे.“अपघात झाले की पंचनामा आणि मृतांची मोजदाद… पण प्रतिबंधात्मक उपाय नाहीत!” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या वारंवार वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेऊन लोकप्रतिनिधी, रस्ते बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण, पोलीस विभाग, नगरपालिका, ॲम्बुलन्स सेवा आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्र येऊन व्यापक धोरण आखण्याची गरज आहे.या वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कृपावती रामचंद्र धनक यांनी नागरिक, स्थानिक संस्था आणि सरकारी यंत्रणांना एका सामूहिक बैठकीचे आवाहन केले आहे.
यामध्ये योग्य प्रकाशयोजना,शास्त्रीय पद्धतीचे स्पीड ब्रेकर,वाहतूक नियोजन,बायपासवर वेगमर्यादा अंमलबजावणी,सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्तीची कामे यांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे. शिरूरमधील वाढत्या अपघातांचा हा धोक्याचा इशारा असून वेळेत कडक उपाययोजना न झाल्यास भविष्यात परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.