शिरुर (तेजस फडके): आपल्या देशात न्यायालयात अनेक खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. त्याची वेगवेगळी कारणे पण आहेत. परंतु “न्यायालय मे देर है, लेकिन अंधेर नहीं” असाच एक अनुभव शिरुर तालुक्यातील उद्योजक बाबासाहेब जासूद यांना आलेला आहे. जासुद यांच्या कर्ज खात्यात अफरातफर केल्याबाबत एका बँकेचा अध्यक्ष, व्यवस्थापक आणि इतर काही संबंधित व्यक्तींवर भोसरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. परंतु त्याचा राग मनात धरून बँकेने राजकीय ताकतीच्या जोरावर रातोरात बाबासाहेब जासूद यांच्यावरचं उलट गुन्हा दाखल केला. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन दिला आणि त्यानंतर दिनांक ६ मे २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा तोच जामीन कायम केलेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे सन २०१५ ते सन २०१७ मध्ये, जी एस महानगर कॉ ऑप बँक शाखा, भोसरी या बँकेने खातेदार बाबासाहेब जासुद यांच्या कर्ज खात्यामध्ये पैशांची अफरातफर केल्याने बाबासाहेब जासूद यांनी ऑगस्ट 2020 मध्ये भोसरी येथील जी एस महानगर कॉ ऑप बँक शाखेचे मॅनेजर अभिजीत कस्तुरे, कुमार मुरलीधर नरवडे, बँकेचे चेअरमन व इतर संबंधित व्यक्तींवर भोसरी पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
त्याचाच राग मनात धरून जी एस महानगर कॉ ऑप बँकेने राजकीय ताकतीच्या बळावर रातोरात बाबासाहेब जासूद यांच्यावरच फसवणूकीचा उलट गुन्हा दाखल केला. त्यावेळी जासूद यांनी न्यायालयात धाव घेत मुंबई उच्च न्यायालयात वकिलांमार्फत आपली बाजु मांडली. त्यावेळी न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजुर केला. त्यानंतर दिनांक ६ मे २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन कायम करत बँकेला समज दिली आहे. बाबासाहेब जासूद यांच्या वतीने त्यांचे वकील विरेश पूरवंत, नरेंद्र शर्मा, रचित खांपारीया यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यामुळे “शेवटी सत्याचाच विजय होतो” असे बाबासाहेब जासूद यांनी शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.