शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच विरोधी उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. आढळराव पाटील यांनी तिकिटासाठी शिवसेना (शिंदे गट) सोडत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने सर्वसामान्य लोक प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे शिरुर येथे आढळराव पाटील यांच्या विरोधात “शिरुर लोकसभेचा डमी उमेदवार, एक, दोन, तीन, चार ह्याला आम्ही पाडणार गद्दारांना गाडणार” असा मजकुर टाकत बॅनरबाजी करण्यात आली आहे.

 

सध्या शिरुर तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीकडुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडुन डॉ अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेले वीस वर्षे शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेची निवडणुक लढवली होती. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच प्राबल्य असतानाही सर्वसामान्य जनतेने आढळराव यांना मताधिक्य देत लोकसभेत पाठवलं होत.

 

परंतु महाराष्ट्र राज्यात गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या आणि सत्तेची समीकरण बदलल्यामुळे आढळराव पाटील यांनी आधी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तिकिटासाठी सोयीस्कर भुमिका घेत परत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यामुळे शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला हि भुमिका पटली नाही. त्याचाच परिणाम म्हणुन एका लग्नात आढळराव पाटील यांच्या वतीने वधू-वराला शुभेच्छा देणाऱ्या शिरुर-आंबेगावच्या एका बड्या नेत्याची कट्टर शिवसैनिक असलेल्या आजोबांनी वऱ्हाडी मंडळी समोरच कानउघडणी केली होती.

 

त्यानंतर आता आढळराव पाटील यांच्या विरोधात शिरुर मध्ये बॅनरबाजी करण्यात आली. त्यामुळे शिरुरकर आढळराव यांच्यावर नाराज असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. तसेच खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार शिरुर शहरात आढळराव यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीत सहभागी होण्यासाठी काही लोकांना पैसे देऊ केले होते. परंतु ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे दिल्याने रॅलीत सहभागी झालेल्या लोकांनी नाराजी व्यक्त केल्याचीही दबक्या आवाजात शिरुर शहरात चर्चा सुरु आहे.

ज्यांच्या विरोधात वीस वर्षे संघर्ष केला, त्यांच्याकडुनच उमेदवारी घेतल्याने आढळराव यांच्यावर मतदार नाराज…?

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत