पुणे येथे न्याय हक्कासाठी मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण सुरु 

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): पुणे येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कंपन्यांच्या तक्रारी संदर्भात न्याय मिळेपर्यंत बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. रांजणगाव एमआयडीसीतील MEPL कंपनीने केमिकल युक्त अति प्रदूषित पाणी मातंग समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या दिशेने सोडलेले आहे. त्यामुळे त्यांची शेती पूर्णपणे नापिक झालेली असुन ओढे, विहिरी आदी जलस्त्रोत प्रचंड दूषित झालेले आहेत. याबाबत रांजणगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन इत्यादी ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार केला असतानाही त्या पत्राला केराची टोपली दाखवली जात आहे.

त्यामुळे MEPL कंपनी आणि त्या कंपनीला पाठीशी घालणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर तात्काळ अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या Deccan industrial Explosives Pvt Ltd या दारूगोळा बनवणाऱ्या कंपनीच्या आतमध्ये मातंग समाजाच्या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. सदर प्रकरण कंपनी प्रशासन ,स्थानिक पुढारी व पोलिसांनी परस्पर हे प्रकरण दडपले असल्याची दबक्या आवाजात चर्चा असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीमध्ये कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सुरक्षिततेच्या अभावी चेंबर मध्ये दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अनेक दिवस उलटूनही राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणी 304(A) प्रमाणे तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली असुन वारंवार निवेदन देऊनही जाणीव पूर्वक मातंग समाजाच्या निवेदनाची दखल न घेता तसेच ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जाणून बुजून क्रॉस कंप्लेंट घेऊन ॲट्रॉसिटी कायदा व घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याला कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या यवत पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाची सविस्तर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्यासाठी सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 पासून शासकीय वेळेत आंदोलनाची दिशा बदलून ते आणखीन तीव्र करण्याचा इशारा मातंग नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण मांढरे यांनी “शिरूर तालुका डॉट कॉम” शी बोलताना दिला आहे.