पुणे विद्यापीठाच्या निकालातील त्रुटींमुळे विद्यार्थी आक्रमक…

मुख्य बातम्या

पुणे : नुकताच पुणे विद्यापीठाने एलएलबी आणि बीएएलएलबीचा निकाल जाहीर केला. एकीकडे कंम्बाईन पासिंगमुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचा दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना पेपर मध्ये शून्य मार्क मिळाल्याचे आढळून आले. तसेच अनेक विषयांना सारखेच गुण मिळाले आहेत असे समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आल्या. पुरवणी जोडून चांगला पेपर लिहून देखील शून्य गुण मिळाल्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या याच मागण्या घेऊन महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिक्षाप्रमुख महेश काकडे सर यांना भेटून निवेदन दिले.

कंम्बाईन पासिंगमध्ये इंटर्नल आणि एक्सटर्नल गुण मिळवून फक्त 40 गुणांची आवश्यकता असताना विद्यार्थी नापास झाले आहेत. तरी याचा वापर कशा पद्धतीने केला गेला आहे याचा लेखी खुलासा विद्यापीठाने करावा. प्रामुख्याने अँडमिनीस्ट्रेटिव्ह लाँ , लॅण्ड लाँ आणि कंपनी लाँ या विषयामध्ये विद्यार्थी नापास झाले आहेत. विद्यार्थ्यांना सर्व विषयांना समान गुण कसे काय दिले गेले ? यात पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांची चूक आहे की तांत्रिक चूक आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 2019- 2020 या शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा कोरोनामुळे झाल्या नाहीत. त्या परिक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1100 रुपये फी घेण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांची फी एकत्र केली तर हा आकडा लाखोंमध्ये आहे. वेळोवेळो मागणी करून देखील विद्यार्थ्यांना ही फी परत करण्यात आली नाही.

22 जून 2022 रोजी महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी एका महिन्याच्या आत ही फी सर्व विद्यार्थ्यांना परत गेली जाईल अशी ग्वाही दिली होती. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. अशा विविध मागण्या परीक्षा विभाग प्रमुख महेश काकडे सरांकडे मांडल्या असता त्यावर त्यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याबाबत विद्यापीठ काळजी घेईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. निकालाबाबतीत आढळलेल्या त्रुटींची चौकशी करण्यात येईल असेही काकडे सरांनी सांगितले. विद्यापीठात असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे इतर कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याची खंत यावेळी सरांनी बोलून दाखवली.

” एलएलमसाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. प्रवेश घेण्याची शेवटची तारीख देखील जवळ आली आहे. तरी विद्यापीठाने लवकरात लवकर नापास विद्यार्थ्यांचा पुनर्निकाल जाहीर करावा.जर विद्यार्थ्यांना वेळेत न्याय विद्यापीठाने दिला तर प्रशासनाचा जाहीर सत्कार संस्थेकडून करण्यात येईल अन्यथा विद्यार्थीहितासाठी आमरण उपोषण संस्थेकडून करण्यात येईल ” असे महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनचे सचिव प्रविण कर्डिले यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक बेदरे , उपाध्यक्ष बालाजी गायकवाड , सचिव प्रविण कर्डिले , जिल्हा कार्यकारणी सदस्य लखन दराडे , तुषार राऊत , सुरज भालेराव , नासिर पाटिल हे उपस्थित होते. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , मॉडर्न विधी महाविद्यालय , डी.वाय.पाटील विधी महाविद्यालय , पीडीइए विधी महाविद्यालय या महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.