सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
शिरूर (अरुणकुमार मोटे): अन्नापुर (ता. शिरूर) येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेला व शेतकऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न अखेर सुटला आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महावितरण प्रशासनाने दखल घेतली व गावातील कृषी रोहित्रांवरील धोकादायक व जीर्ण झालेल्या फ्यूज पेट्या बदलून नवीन पेट्या बसवल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे – केंगार मळा- १,माळीवस्ती- २,कॉलोनी- १ अशा एकूण चार वेग वेगळ्या ठिकाणी रोहित्रांवर नवीन पेट्या बसविण्यात आल्या आहेत.
वाळुंज यांनी दिलेल्या माहितीनुसार अधीक्षक अभियंता बारामती श्री. दीपक लहामगे यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता तदनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर येथील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता श्री. सुमित जाधव, उपकार्यकारी अभियंता श्री. शरद माने व सहाय्यक अभियंता श्री. वैभव बारवकर यांनी संयुक्त प्रयत्नातून ही कामे पूर्ण केली गेली.
“ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्या जीवितास सतत धोका निर्माण करणाऱ्या धोकादायक फ्यूज पेट्यांच्या बदलामुळे आता रोहित्र सुरक्षित स्थितीत राहणार असून शेतकऱ्यांच्या जीवितधोक्याचे मोठे संकट टळले आहे. या कामामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. महावितरण व संबंधित अधिकाऱ्यांच्या ह्या कृतीमुळे समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील, तालुक्यात जिथे कुठे धोकादायक फ्यूज पेट्या असतील, त्या महावितरण कडून स्वप्रेरणेने बदलण्यात याव्यात.”
निलेश मंदा यशवंत वाळुंज
(सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)