शिरुर; मनरेगा गैरव्यवहाराचा खोटा आरोप…? देशमुखांचा पवारांवर पलटवार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथे मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा मच्छिंद्र बापूराव पवार यांनी आमच्यावर खोटारडा आरोप केला आहे. तसेच हे आरोप खोडसाळ आणि निराधार असुन त्यांनी दिशाभुल केली असल्याचे प्रदीप सुरेश देशमुख यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.

देशमुख म्हणाले, “गट नं. ६१७ ची मी स्वतःच्या खर्चाने मोजणी करून घेतली. त्यावेळी मच्छिंद्र पवार यांच्यासह गावातील १५ व्यक्ती उपस्थित होत्या. त्यावेळी गावकऱ्यांसमोर ती मोजणी मान्य असल्याचे पवार यांनी तोंडी सांगितले. पण काही दिवसातच पलटी मारत त्यांनी आमच्या विरोधात शिरुर येथे पंचायत समितीच्या कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला. विहिरीचे काम सुरु असताना ते गप्प बसले. पण काम संपल्यावर त्यांनी आमच्यावर खोटेनाटे आरोप करुन गावाची दिशाभुल केली.

प्रदीप देशमुख पुढे म्हणाले, माझ्या आज्जीच्या श्राद्धकाळातदेखील तसेच विजयादशमीच्या दिवशी गावभर आमची बदनामी झाली. पवार यांचा आम्हाला जाणूनबुजून छळण्याचा हेतु असुन केवळ वैयक्तिक सूड म्हणून हा सर्व प्रकार सुरु आहे. तसेच ग्रामसेवक, रोजगार सेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात ओढुन त्यांची प्रतिमा मलिन केली जात आहे.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, गट नं. ४७, ६२२ व ६२० या जमिनी आमच्या कायदेशीर मालकीच्या आहेत. तरीसुद्धा उपोषणकर्ते मच्छिंद्र पवार हे खोटे आरोप करुन मला व माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देत आहेत. पवार यांनी विनाकारण सामाजात आमची बदनामी थांबवावी अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्ग अवलंबवावा लागेल.

शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा