शिरूर तालुक्यात रासायनिक खत विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांचा सुलतानी कारभार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कृषी विभाग सुस्त, दुकानदार बिनधास्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात रासायनिक खत विक्री दुकानदार खते किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करत असून दुसरीकडे युरियाचा मोठा साठा शिल्लक असताना शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नसल्याचे कारण रासायनिक खत विक्री दुकानदार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर उमटत आहे.

शिरूर तालुक्यात चाललय तरी काय? कृषी विभाग आर्थिक तडजोडीमुळे निद्रीस्त अवस्थेत असून दुकानदार मात्र बिनधास्त असून शेतकऱ्यांचा खतांसाठी छळ होत आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी हा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. अनुदानित खतांची विक्री ई-पॉस मशिनद्वारे (E-POS machine) द्वारे करणे खत विक्रेत्यांना बंधनकारक आहे. रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्रेत्याने विक्री करणे देखील गुन्हा आहे. आणि ह्या घटना काही नवीन देखील नाहीत,जवळपास राज्यभर/देशभर युरिया सह इतरही अनुदानित खते चढ्या दराने विक्री होत असल्याच्या याविरोधातील अनेकदा विविध प्रसार माध्यमात आणि वृत्तपत्रांत बातम्याही प्रसिद्ध झाल्या शेतकऱ्यांनीही तक्रारी केल्या परंतू परिस्थिती जैसे थे आहे.

अन्नापुर येथील “शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज” यांनी (दि. २४) फेब्रुवारी २०२५ रोजी अन्नापूर येथील यशवंत ॲग्रो येथे फ़ोन करून युरिया आहे का? याबाबत विचारणा केली असता संबंधित दुकानात युरिया शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले,यानंतर वाळुंज यांनी शिरूर येथील “बढे ॲग्रो एजन्सी शिरूर” येथे जाऊन चौकशी केली असता तेथे युरिया उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले परंतु त्यासाठी “३००/- रु लागतील असे सांगण्यात आले, वाळुंज यांनी ही रक्कम “इतर upi द्वारे दुकानदार यांना क्यूआर कोड द्वारे ऑनलाइन पद्धतीने पाठवली.सुरवातीला साधे बील देण्यात आले होते. वाळुंज यांनी संगणक बिलाची मागणी केली .त्यानंतर बील देण्यात आले, आणि एक गोणी युरिया “छ.शिवाजी महाराज” पुतळ्याजवळ असलेल्या गोदामातून देण्यात आली.

युरियाची अनुदान वजा विक्री किंमत २६६.५ आहे परंतु यासाठी जवळपास ३४/- रुपये एका गोणीमागे जास्त घेतले गेले, असल्याने याप्रकरणी वाळुंज यांनी फ़ोन आणि व्हॉट्स ॲप च्या माध्यमातून लेखी तक्रार “तालुका कृषी अधिकारी शिरूर सुवर्णा आदक, जिल्हा कृषी विकास अधिकारी जि.प.अजित पिसाळ, यांच्याकडे केली आहे, तसेच तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांच्या कार्यालयात भेटूनही तक्रार देत यामुळे शेतकरी कसा भरडला जातो याची व्यथाच मांडली. याप्रकरणी योग्य कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली,यावेळी पत्रकार तथा ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे आणि प्रगत शेतकरी शेखर कुरंदळे उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनी सांगितले की ,वाळुंज यांनी केलेली तक्रारीत तथ्य असून याबाबत चढ्या युरिया विक्री करणाऱ्या संबंधित दुकानी जाऊन खात्री करून घेतली आहे आणि त्यांना योग्य ती समज देण्यात आली असून, याप्रकरणी व अन्नापुर येथील यशवंत अग्रो या दुकानदारानी ४.०५ मे.ट.(mt) युरिया शिल्लक असूनही त्यांनी युरिया शिल्लक नसल्याचे सांगितल्याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सुवर्णा आदक यांनी सांगितले असून यापुढे असे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी मा.तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व कृषी औषध/खत विक्रेता दुकानदारांची बैठक आयोजित करणार आहे.

देश स्वतंत्र होवून ७६ वर्ष झाली इंग्रजांच्या जुलूम आणि लुटीतून देश मुक्त झाला, परंतु आजही तीच लूट वेग वेगळ्या मार्गाने सुरू आहे, भ्रष्टाचारी नावाचा ब्रह्मराक्षस कॅन्सरसारखा पसरत चाललाय, शेतकऱ्यांना वेठीस धरून लुट करणाऱ्या दुकानदारांचे/कंपन्यांचे रासायनिक खत (fertilizers) विक्री परवाने अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५” व खत नियंत्रण आदेश १९८५” मधील तरतुदींनुसार कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत. गावातील दुकानात ado यांनी सांगितल्यानुसार “४.०५ मे.ट) युरिया शिल्लक असताना देखील हा दुकानदार युरिया शिल्लक नसल्याचे बिंधास्त सांगतो, यांचे पाठीराखे कोण? तालुक्यात एकीकडे सरकारी कार्यालयांत भ्रष्टाचार वाढतोय अवैध धंदे माफिया डोकी वर काढून आहेत. योग्य शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत,शेतमालामध्ये जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. ता.कृ.अधिकारी यांनी दोन्ही तक्रारीची खात्री केलेली आहे तालुका कृषी अधिकारी आणि जि.कृ.वि.अधिकाऱ्यांनी (ado) यांनी योग्य कारवाई आणि उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले आहे त्याची योग्य पूर्तता तत्काळ तालुक्यात आणि जिल्ह्यात न झाल्यास आदरणीय पद्मभूषण आन्ना हजारे यांचे मार्गदर्शन घेऊन जनआंदोलन करणार आहे.

नीलेश यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)