Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून धिंगाणा घालणाऱ्या वाळू माफियांनी घोड धरण अक्षरशः ताब्यात घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धरणातील अवैध वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक बोटी तीन वेळा फोडूनही वाळू माफियांचे वाळू चोरण्याचा सपाटा चालुच आहे.

याबाबत वेळोवेळी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने याबाबत वेळोवेळी सडेतोड बातम्या केल्या होत्या. त्यानंतर महसुल विभागाने कारवाई करत सलग तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या. त्यानंतर काही दिवसातच वाळू माफिया पुन्हा धरणात यांत्रिक बोटींच्या साह्याने वाळूची चोरी करतात. प्रशासनाकडून तीन वेळा कारवाई होऊनही वाळू माफिया त्यांना “जमत असेल तर थांबवून दाखवा” असे सरळसरळ आव्हान देत आहेत. त्यामुळे भविष्यात गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे.

या धरणातील वाळू उपसा केवळ बेकायदेशीरच नाही तर धरणाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारा आहे. हे धरण पुर्णपणे मातीचे धरण असुन भविष्यात पाण्याच्या साठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तरीही काही स्वयंघोषित राजकीय पुढारी आणि वाळू माफियांच्या मिलीभगतीमुळे वाळू उपसा बेधडक सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

या बेकायदेशीर वाळू उपशामुळे घोड धरणाच्या कडेला राहणारे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींचा रोष वाढत असुन, “तीन वेळा बोटी फोडल्या तरीही माफिया थांबत नसतील, तर कुणाच्या आशिर्वादाने हा धंदा सुरु आहे…?” असा थेट सवाल ते प्रशासनाला विचारत आहेत. आता या माफियांवर खर्‍या अर्थाने कारवाई होणार का…? की घोड धरणातील वाळूचा ‘सोनेरी धंदा’ असाच सुरु राहणार…? या प्रश्नावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

(क्रमश:) 

Video; घोड धरण नक्की कुणाच्या मालकीच…? पाटबंधारे खाते, राजकीय नेते की वाळू माफिया…?