हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत; योग्य आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्तीत वाढ

आरोग्य

हिवाळ्याच्या दिवसांत मानवी शरीराची पचनशक्ती इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक सक्षम असते. त्यामुळे या काळात घेतलेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी हिवाळी आहाराला विशेष महत्त्व आहे, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

हिवाळ्यात शरीराला ऊब देणारे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. तीळ आणि गूळ हे उष्ण गुणधर्माचे असून गुळात लोहाचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच मकर संक्रांतीच्या काळात तीळगुळाचे पदार्थ खाल्ले जातात. तसेच बाजरीची भाकरी शरीराला ऊब देत असून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

या ऋतूत उपलब्ध असलेल्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी, शेपू, मोहरीचा साग यामध्ये लोह व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. गाजर, बीट, रताळी यांसारखी कंदमुळे आहारात घेतल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळतात. गाजराचा हलवा किंवा कांजी हे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.

हिवाळ्यात विशेषतः डिंकाचे लाडू, साजूक तूप आणि सुका मेवा यांचा समावेश केल्यास हाडे मजबूत राहतात. रात्री भिजवलेले बदाम किंवा खारीक दुधात घेणे शक्तिवर्धक ठरते. तसेच संत्री, मोसंबी, आवळा, पेरू यांसारखी व्हिटॅमिन-सी युक्त फळे सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करतात.

सीताफळ आणि बोरं ही हिवाळ्यातील खास फळे असून त्यांचा वापर करणे फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. जेवणात आलं, लसूण आणि मिरी यांचा वापर केल्यास कफ कमी होण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात तहान कमी लागत असली तरी कोमट पाणी नियमित प्यावे, ताजे व गरम अन्न घ्यावे आणि अति तेलकट तसेच जंक फूड टाळावे. योग्य आहार आणि दिनचर्या पाळल्यास हिवाळा आरोग्यदायी ठरू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)