शरीरात जास्त उष्णता झाली असेल तर…

आरोग्य

शरीरावर चांदीचे दागिने वापरायचे. हातामध्ये तांब्याचे कडे वापरावे. दररोज रात्री काळी मनुके कोमट पाण्यात भिजत घालायचे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे. दररोज दुपारच्या जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे. रात्रीच्या जेवणा मध्ये नाही. जिऱ्याचे पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावे. सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून अनुशापोटी घ्यावे.

दोन्ही वेळचे जेवण लवकरच घ्यावीत…

जेवणामध्ये भात घेतला तर उष्णतेचे विकार व्हायची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते. फळांमध्ये कलिंगड, ताडगोळे, द्राक्ष, डाळींब इत्यादी खावे. जेवणामध्ये पुदिन्याची चटणी घ्यावी. फणस आणि अननस ही फळ उष्णता वाढवतात. ही फळ कुठल्या तरी त्यांच्या पदार्थ रूपांमध्ये खायची. अननसाचे सरबत, फणसाची पोळी इत्यादी.

तहान लागली नसेल तरी भरपूर पाणी प्यावे

लिंबाचे सरबत, कोकम सरबत घ्या. ज्या शक्य आहे त्या गोष्टी सकाळच्या नाष्ट्यानंतर घेतल्या तर त्याचा उपयोग शरीरासाठी खूप चांगल्या प्रमाणात होतो. नाकामधून रक्त येणाऱ्यांनी डोक्यावरती पाणी मारावे. ज्यांना खूपच प्रमाणात उष्णतेचा त्रास होतो त्यांनी अंघोळ केल्यावर ती ओल्या अंगाने पाच मिनिटे तसेच थांबावे. नंतर थंडावा प्राप्त होतो. सकाळ संध्याकाळ दोन वेळ अंघोळ करावी. रात्री झोपताना उजव्या कुशीवर झोपले तर चंद्रनाडी चालू राहून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो. मसाले, आंबट, खारट, तिखट कमी प्रमाणातच घ्यावे. रोजच्या जेवणामध्ये फोडणीला जिरं जास्त प्रमाणात वापरावे. मोहरी, हळद, हिंगाचा वापर कमी ठेवावा. मसाल्याच्या ऐवजी धने-जिरे याची पावडर वापरावी.

खूप प्रमाणात तोंडामध्ये काही पुळ्या येतात तोंड आले असे म्हटले जाते. सर्वात आधी पोट साफ ठेवावे. आणि अगदीच शक्य नसेल त्यांनी बी कॉम्प्लेक्स च्या गोळ्या घ्याव्या. जे लोक कॅल्शियम घेत असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शिअमच्या गोळ्यांची पॉवर कमी घ्यावी. पण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच. उन्हाळ्यामध्ये लघवीला जळजळ अनेकांना व्हायची शक्यता असते. त्यावर एक उत्तम उपाय म्हणजे आपण अनेक वेळा सांगितलेला सब्जा हेच आहे. ज्यांना गोड आवडत नसेल त्यांनी नुसताच सब्जा घ्यावा. दुपारच्या जेवणामध्ये ताक – भात खाल्ल्याने सुद्धा शरीरामध्ये गारवा मिळतो. कधीकधी नाईलाजाने आपल्याला स्पायसी फूड म्हणजे मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि ते खाण्यात आल्यावर थोड्यावेळाने लगेच कोकम सरबत घ्यावे.

उन्हाळा फार कडक आहे. काळजी घ्यावीच लागते. कडक उन्हामुळे अंगाची अक्षरश: लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्येही घमाच्या धारा अशी परिस्थिती आहे. अशा गरम वातावरणात आहार-विहार कसा असावा याविषयी आयुर्वेद काय म्हणतो ते पाहूया –

काय करावे-काय टाळावे?

उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या दिवसांत सूर्याची तीव्र उष्णता शरीरातील स्निग्धता कमी करते. त्यामुळे कडक उन्हाचा त्वचेशी थेट येणारा संपर्क टाळायला हवा. या दिवसांत खूप घाम येत असल्याने कमी कपडे घालण्याकडे सर्वाचा कल असतो. पण विशेषत: बाहेर पडताना त्वचा कपडय़ांनी झाकणे गरजेचे आहे. पण अंगभर कपडे घातले तरी त्वचेच्या उष्णता बाहेर टाकण्याच्या कार्यात अडथळा येता कामा नये अशा प्रकारचे कपडे असावेत. ‘सिंथेटिक’ कापडाचे कपडे टाळावेत. ते उष्णता कोंडून ठेवतात. त्याऐवजी सुती, खादीचे किंवा कोणतेही नैसर्गिक कापडाचे कपडे वापरा.

शीतल जलाने स्नान करा, असेही सांगितले गेले आहे. शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.ग्रीष्म ऋतूत दिवसा झोपावे असेही सांगितले आहे. इतर वेळी दिवसाची झोप अयोग्य समजली जाते. पण या दिवसांत थंड खोलीत दुपारीही थोडा वेळ झोपले तर चालू शकते. तर रात्री चांदण्यात झोपण्याचा सल्ला आयुर्वेदात आढळतो.या ऋतूची आणखी एक वेगळी बाब अशी की, या दिवसांत व्यायाम कमी करावा. अति व्यायामाने नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हलका (मॉडरेट) व्यायाम या दिवसांत चांगला.

अन्न-पाणी कसे असावे?

आंबट, खारट आणि तिखट पदार्थ या ऋतूत शक्यतो टाळावेत. त्याच्या उलट म्हणजे मधुर, कडू आणि कषाय (तुरट) द्रव्यांचे सेवन अधिक करावे. फार जड व पचनशक्तीवर ताण पडेल असे काही खाऊ नये. ग्रीष्मात पांढरा तांदूळ खावा. पांढरा म्हणजे चांगला पॉलिश केलेला तांदूळ. खरे तर इतर वेळी आपण पॉलिशचा तांदूळ नकोच, असे म्हणतो. पण उन्हाळ्यात तो चालेल. आहार घेताना दर तीन तासांनी खा. असे सर्रास सांगितले जाते.

उन्हाळ्यात मात्र ते फायदेशीर ठरेलच असे नाही. पचायला सोपा, हलका आहार घ्यावा. तसेच वारंवार न खाता ठरलेल्या २-३ वेळांना आहार घ्यावा. असे सांगितले जाते. रात्री झोपताना म्हशीचे दूध प्यावे असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. म्हशीच्या दुधात स्निग्धता अधिक असते. साखर ज्यांना चालते त्यांनी साखरयुक्त दूध प्यायले तरी चालेल.या ऋतूत मद्यपान शक्यतो वज्र्य असावे. पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेदात ‘सुगंधी सलीला’चे सेवन करा, असा उल्लेख आहे. सुगंधी सलील म्हणजे नवीन माठातले मोगरा किंवा चंपासारखी ताजी सुगंधी फुले घातलेले पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिणे व नेहमी बरोबर पाणी बाळगणेही गरजेचे.

काही महत्त्वाचे

आयुर्वेदात शरीरातील ‘मर्म’ सांगितली गेली आहेत. ही मर्म म्हणजे शरीरातील नाजूक ठिकाणे. त्यांना इजा पोहोचू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. डोके हे त्यातील महत्त्वाचे मर्म. उन्हात बाहेर जाताना डोके झाकलेले हवे असे म्हणतात ते त्यासाठीच. आपला मेंदू आणि डोळे हे खूप महत्त्वाचे अवयव आहेत. मेंदूत एकाच वेळी विविध प्रकारच्या रासायनिक क्रिया सुरू असतात. मेंदूची स्वत:ची एक प्रकारची उष्णता तिथे असते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करणारे केंद्रही मेंदूतच आहे. उष्माघाताच्या वेळी या केंद्राच्या कामात बिघाड होतो. कदाचित त्यामुळेच आपल्या देशात विविध प्रकारची शिरस्त्राणे वापरत असावेत.

ऊन वाईट नाही. लहान मुलांची उंची वाढते. चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी कोवळ्या उन्हाचा उपयोग होतो. शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता व हाडांची झीज टाळण्यासाठीही त्वचेवर कोवळे ऊन पडणे चांगलेच. शिवाय ऊन हे जंतूंचा नाश करणारे आहे. हे विसरून चालणार नाही. त्यामुळे उन्हाळा वाईट नाही. कडक उन्हापासून मात्र काळजी घ्यायलाच हवी.

मराठवाडा, विदर्भ, खान्देशात दिवसा बाहेर जाताना किंवा बाहेरून आल्यावर हातापायांना कांद्याचा रस चोळणे हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला उपाय आहे. खूप ऊन असलेल्या देशांमध्ये पाहिले तरी अंगभर कपडे, सुती कपडे, डोके झाकणे या पद्धती दिसतात. नामिबियामधील आदिवासींमध्ये तर गेरू व लोणी एकत्र करून उन्हापासून संरक्षणासाठी त्वचेवर त्याचा लेप घालण्याची पद्धतही दिसते.

(सोशल मीडियावरुन साभार)