कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का? कॅन्सर विरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर लक्षात आले तर ही लढाई जिंकता येते, हे अलीकडे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. पण अन्यथा या बाबतीत डॉक्टर शब्द वापरतात सर्व्हायवल रेट म्हणजेच ते रोगाच्या राहिलेल्या वर्षांचा हिशोबच उलगडत असतात.
आपल्या शरीरातील असंख्य प्रकारच्या पेशी त्यांना दिलेली कामे निमूटपणे करत असतात. पण अचानक त्यांतील काही बंड करतात. त्यांचा आकार वेडावाकडा वाढू लागतो, त्यांना नेमून दिलेली कामे होईनाहीशी होतात. त्यांची शरीराला अडचण होऊ लागते. अन्य अवयवांचे काम करायला त्यांचा अडथळा येऊ लागतो. या अडथळ्यांचाच एक परिणाम म्हणजे वेदना. जसजसे विविध प्रमुख अवयवांचे अडथळे वाढतात, तसतसे शरीर साथ देईनासे होते. यातुनच मृत्यू ओढवतो. आपल्या शरीरात रक्तरस म्हणजे लिम्फ नावाचा रस सर्वत्र रक्तरसवाहिन्यांतून वाहत असतो. कॅन्सरच्या पेशींचा या वाहिन्यांतून फैलाव सगळ्या शरीरभर होऊ शकतो. जेथे फैलाव होईल, तेथे त्यांची पुन्हा वाढ होऊ लागते. ज्यावेळी यकृत, फुप्फुस, प्लीहा, मेंदू या जागा या पेशींनी व्यापल्या जातात तेव्हा संपूर्ण शरीराचेच कार्य बंद पडू लागते.
शरीरातील पेशी अशा का बंड करून उठतात याचा अजून आपल्याला पत्ता नाही. पण त्यांना बंड करायला प्रवृत्त करणाऱ्या वस्तूंना आपण कार्सिनोजन्स व कॅन्सरकडे प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी म्हणून संबोधतो. उदारणार्थ, डांबर व त्यापासून बनणाऱ्या पदार्थाने कातडीचे कॅन्सर होतात, क्ष-किरणांमुळे कातडीचे व रक्तातील पेशींचे कॅन्सर होतात, तंबाखूमुळे तोंडातील कॅन्सर होतात, तर धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सारख्याच वातावरणात त्याच वस्तूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतोच, असे नव्हे, तर त्या वातावरणात न येणाऱ्या पेक्षा या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते आज घटकेला जगातील अनेक प्रमुख संशोधन संस्थांतून कॅन्सर विरोधी औषधाबद्दल संशोधन केले जात आहे. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसाही ओतला जात आहे. पण नेमका प्रतिबंध व नेमका इलाज सापडणे खूपच दूर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व वापरात असलेल्या इलाजामध्ये मुख्यत: बंड करणाऱ्या पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचा नाश करण्याची उपाययोजना आखली जाते. पण अनेकदा या इलाजामध्ये निरोगी पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची तब्येत अधिकच त्रास देऊ लागते.
कॅन्सर विरोधी इलाज म्हणून एका औषधाकडे आशेने पाहिले जाते. ते म्हणजे इंटरफेराॅन, रक्तातील गॅमाग्लोब्युलिन पासून हे औषध तयार करून वापरले जाते, पण त्याची किंमत, निर्मिती हा त्याच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे. काही वर्षांपूर्वी फक्त कॅन्सरच्या पेशी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे एवढाच इलाज होता, त्यानंतरचा इलाज म्हणजे क्ष-किरणांचा एकत्रित मारा ठराविक डोस मध्ये करणे. यानंतर कोबाल्ट किरणांचा मारा करण्याची पद्धत सुरू झाली. पण नंतर प्रगत औषधे जशी उपलब्ध झाली आहेत, तसे शरीरभर पसरत गेलेल्या कॅन्सर पेशींवर नियंत्रण घालणे शक्य होऊ लागले. विशेषत: रक्ताचा कॅन्सर, रक्तामार्फत पसरणारे कॅन्सर यांवर ही औषधे वापरणे आता सुरू झाले आहे.
कॅन्सरच्या संदर्भात नवनवीन औषधांचा वापर करताना त्याच्या दुष्परिणामांची माहिती रुग्णांना दिली जाते त्यांची परवानगी घेतली जाते व मगच इलाज केले जातात. यामध्ये अनेकदा औषधांचा वापर प्रथम करण्याची वेळ येते व रुग्णांना प्रथमच वापरले जाणारे औषध त्याचे दुष्परिणाम किंवा मृत्यू यातील एकाची निवड करावयाची असते.
(सोशल मीडियावरून साभार)