rahata-marriage

महाराष्ट्रभर चर्चा! अहमदनगर जिल्ह्यात लागले स्मशान भुमित लग्न…

महाराष्ट्र

अहमदनगर: स्मशानभूमी म्हंटले की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र असते. पण, राहाता शहरातील स्मशानभूमीत विवाह सोहळा पार पडला. सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले. या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह करत आहे. इतरांसाठी अशुभ असणारी स्मशानभूमी त्यांच्यासाठी पोटापाण्याचा साधन झाली. याच ठिकाणी राहून आपल्या मुलीच शिक्षण पूर्ण केले. मयुरीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्नासाठी वराची निवड करण्यात आली आणि लग्न थेट स्मशानभूमीतच लावण्याचा निर्णय गायकवाड दाम्पत्याने घेतला. मयुरी व मनोज यांच्या विवाह सोहळ्यासाठी स्मशानभूमीतच मांडव टाकण्यात आला. सनई चौघाड्यांचा सुरात आणि शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

विवाह सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अंधश्रद्धेला फाटा देणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले. आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात मनोज आणि मयुरीने थेट स्मशानभूमीत केली आहे. गायकवाड दाम्पत्याने आपल्या मुलीच्या नवीन प्रवासाची सुरुवात याच ठिकाणाहून करत समाजाला अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेशच दिला आहे.

दरम्यान, मयुरीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले तर शिर्डीत वास्तव्य करणाऱ्या मनोज जयस्वाल यांचेही शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. दोघेही शिर्डी येथील एका ठिकाणी कामाला असल्याने त्यांची मैत्री झाली. पुढे याच मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. पुढे जाऊन त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. दोघांच्या घरच्यांनीही लग्नाला परवानगी दिली. विवाह सोहळा राहाता शहरात स्मशानभूमीच्या प्रांगणामध्ये थाटामाटामध्ये संपन्न झाला असून, विवाहाची राज्यभर चर्चा सुरू आहे.