grampanchayat-karegaon

कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार…

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील अनावश्यक कचरा कारेगावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे जाळल्याने मोठया प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. पर्यावरणाला हानी पोहचत असताना कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार पुढे आला आहे.

विद्यमान सरपचांनी रांजणगाव MIDC तील एका कंपनीला पञ व्यवहार करुन तुमच्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असल्याचे म्हटले होते. दुस-याच महिन्यात प्रदुषण नियञंण महामंडळाला दिलेल्या पञात कंपनीचे कसले ही प्रदुषण होत नसल्याचा खुलासा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात ग्रामपंचायतच्या वतीने कंपनीशी पञ व्यवहार करताना केवळ सरपंच निर्मला शुभम नवले यांनी सही केली आहे. तर प्रदुषण होत नसल्याच्या खुलाशावर सरपंचासह ग्रामसेवकांनी ही सही केल्यामुळे ग्रामसेवकांच्या परस्पर हा पञ व्यवहार करण्याचा सरपंचचा नेमका हेतू काय…? या चर्चेला उधाण आले आहे.

आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC लगत असणाऱ्या रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगाव, बाभुसकर खुर्द, करडे या गावात मोठया प्रमाणात आर्थिक सुबत्ता आली. त्यामुळे या गावात ग्रामपंचायत निवडणुका दरम्यान मोठया कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन गावची सत्ता आपल्याच हातात कशी येईल यासाठी चढाओढ सुरु झाली. तसेच गावाच्या तसेच तालुक्यातील राजकीय पदांचा गैरवापर करुन रांजणगाव MIDC तील विविध कंपनीत काम मिळविण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. त्यातच आता कारेगाव येथील ग्रामपंचायतच्या राजकारणामुळे कारेगावचे नाव सध्या विविध सरकारी कार्यालयात चांगलेच चर्चेत आले आहे. विद्यमान ग्रामपंचायत पदाधिका-यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील K Flex ही कंपनी कारेगाव हद्दीत येते. या कंपनीस मागील चार वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्यावेळी धुराचे लोट पुर्णतः फलकेमळा व शिवारात घुसले होते. दरम्यान 27 जुन 2022 रोजी कारेगाव ग्रामपंचायतच्या वतीने कंपनीला एक पञ देण्यात आले. या मध्ये कंपनीमध्ये निघणारे रबर वेस्ट जाळले जाते. त्यापासुन मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यास मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. या प्रदुषणामुळे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे आलेल्या आहेत. तरी आपण आपल्या कंपनीत निघणाऱ्या वेस्ट रबरची कशा प्रकारे विल्हेवाट लावता याचा लेखी खुलासा नोटीस मिळाल्या पासुन सात दिवसांत ग्रामपंचायतीकडे सादर करावा. अन्यथा आपणा विरुद्ध पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असा पञ व्यवहार कारेगाव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला होता.

या निवेदना च्या प्रती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महाराष्ट्र प्रदुषण नियंञण महामंडळ आणि केंद्रिय प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंञण महामंडळ प्रदूषण होत असल्याबाबत K Flex कंपनीला प्रदुषणा बाबत नोटीस पाठवत होते. माञ, एक महिन्याच्या आत कारेगाव ग्रामपंचायतला असा कोणता साक्षात्कार झाला की त्यामुळे थेट ग्रामपंचायतनेच कंपनीची बाजू घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला 21 जुलै 2022 रोजी पत्र पाठवत आपल्या विभागाकडून वारंवार येणाऱ्या काही नोटीसांच्या सखोल चौकशी नंतर ग्रामपंचायतच्या असे निदर्शनास आले आहे की, कंपनी कुठल्याही प्रकारचे प्रदुषण करत नसून पर्यावरणाची हानी करत नसल्याचा खुलासा केला.

कंपनीने आपल्या उत्पादनातून निघणारे रबर वेस्ट हे कारेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील एका ग्रामस्थाच्या खाजगी जागेत साठवून ठेवलेले होते आणि त्याबाबतचा कायदेशीर करारनामा ही कंपनीने सदर ग्रामस्था सोबत केला आहे. कंपनी सदर रबर वेस्ट आपल्या उत्पादनात वापरणार होती व याबाबत चाचण्या ही कंपनीत चालू होत्या. व चाचण्या झाल्यावर उत्पादन चालू केले. याच काळात प्रदुषण नियंञण मंडळा कडून नोटीसा पाठवण्यात आल्या. त्या निर्देशानुसार कंपनीने त्यांचे सर्व रबर वेस्ट परत नेले व त्यावर प्रक्रिया करुन पर्यावरण पुरक उर्जा बचती संदर्भात उत्पादन बनविले असून कंपनीने कुठल्याही प्रकारचे रबर वेस्ट जाळून पर्यावरणाची हानी केली नाही, असे ग्रामपंचायतीला वाटते अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी ग्रामपंचायत हद्दीत कार्यन्वित असुन कुठल्याही ग्रामस्थाची कंपनी विरोधात आजतागायत तक्रार नाही. कंपनी कुठल्याही प्रकारचे प्रदुषण करत नसल्याचा खुलासा कारेगाव ग्रामपंचायतच्या वतीने प्रदुषण नियंञण मंडळाला करण्यात आल्याने कारेगाव ग्रामपंचायतच्या कारभारा विषयी शंका निर्माण झाली आहे. प्रथम सरपंचांनी कंपनीकडे लेखी तक्रार करायची आणि नंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे खुलासा करुन सारवासारव करायची, यामागचा या पदाधिकाऱ्यांचा नक्की हेतू काय आहे? हे सांगायला कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही.

याबाबत कारेगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांच्याशी संपर्क साधला असता, मला त्या पत्राबाबत काहीच माहिती नसुन या पत्राबाबत तुमच्याकडे कोणी तक्रार घेऊन आले आहे का…? असे उत्तर देत मला याविषयी कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले. (क्रमश:)